संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराचे ‘विद्रूपीकरण’ थांबवण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी (९ ऑक्टोबर) एक कळकळीचे पत्र लिहिले आहे. शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टरमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार या पत्राच्या अनुषंगाने काय दखल घेतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
‘एक संगमनेरकर’ म्हणून संवाद – तांबे यांनी हे पत्र आमदार म्हणून नव्हे, तर ‘एक संगमनेरकर’ म्हणून लिहिले असून, ते स्वतः देखील याप्रकरणी दोषी असल्याची कबुलीही देतात. राजकीय स्पर्धेत नाईलाजाने आवडत नसतांनाही आम्हाला उतरावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. संगमनेर हे केवळ शहर नाही, तर ती आपली संस्कृती, ओळख आणि गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या जनतेचे घर आहे. शहराला आधुनिक बनवण्यात आणि शांतता निर्माण करण्यात तांबे यांचे वडील तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, आई माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, तर माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शहराला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि कॉलेज रोड (ज्याला लक्ष्मी रोड म्हणून देखील ओळखले जाते) चौपदरी करून शहराची एक ओळख निर्माण केली. त्यामुळे या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सध्या एक अस्वस्थता आहे, कारण ‘आपल्या शहराचं रूप बेशिस्त फ्लेक्सच्या गर्दीत हरवत चाललं आहे!’.
अवैध फ्लेक्समुळे शहराचे सौंदर्य हरपले – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात आणि तालुक्यात अवैध फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. मोठमोठे फ्लेक्स, झेंडे लावताना आनंद होत नाही, उलट वेदनाच होतात, असे तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे. या अनधिकृत जाहिरातबाजीमुळे शहराचा दर्शनी भाग, रस्ते, चौक, बसस्थानक, मोठमोठ्या इमारती, एवढंच नव्हे तर मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे सौंदर्यसुद्धा झाकोळून टाकले आहे. ‘कमानीवर कमानी, फ्लेक्सवर फ्लेक्स’ लावून शहरात गोंधळ निर्माण झाला आहे.
यामुळे राजकीय तणाव आणि वाद वाढत आहेत. फ्लेक्स फाडण्याचे प्रकार सुरू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, शहराचे शांत आणि सुसंस्कृत वातावरण बिघडत आहे. त्यामुळे हे विद्रुपीकरण आता थांबायलाच हवे, अशी मागणी त्यांनी केली.
स्वतःपासून सुरुवात आणि प्रशासनाकडे विनंती – आमदार तांबे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आग्रहाची आणि तळमळीची विनंती करत, ताबडतोब शहरात लावलेले सर्व अवैध फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टर काढून ‘लाडक्या संगमनेर शहराचं बिघडलेलं सौंदर्य पुन्हा परत आणण्याची’ मागणी केली आहे. या शिस्तीची सुरुवात स्वतःपासून करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपले जेवढे अवैध फ्लेक्स शहरात असतील, ते मी स्वतः तात्काळ काढणार असून, तरी एखादा राहिलाच तर प्रशासनाने तो बिनधास्त काढून टाकावा, याचा मला आनंदच होईल, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
शिस्तीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना – भविष्यात विद्रूपीकरण होऊ नये यासाठी तांबे यांनी प्रशासनाला विनम्र सूचना केली आहे. प्रशासनाने तातडीने फ्लेक्स/झेंडे/पोस्टर लावण्यासाठी योग्य जागा निश्चित करून द्याव्यात. तसेच, परवानगीशिवाय किंवा निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतर कोठेही फ्लेक्स लावल्यास सक्त मनाई करून गुन्हे दाखल करावेत.
नेमकं काय म्हटलं पत्रात….
प्रशासनाने ‘पाठीचा कणा’ दाखवत ही शिस्त आणि आचारसंहिता लागू केल्यास, मी आणि माझ्यासारखे सर्व राजकीय नेते-कार्यकर्ते, व्यावसायिक आणि तमाम संगमनेरकर ती निश्चितपणे पाळू, अशी खात्री तांबे यांनी दिली आहे. चला, आपल्या शहराला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि गर्व वाटावा असं बनवूया, असे आवाहन त्यांनी केले आहे. संगमनेर नगरपरिषद आणि प्रशासन याबाबतीत कोणती भूमिका घेणार, हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे तांबे यांनी शेवटी नमूद केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी माहितीसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवली आहे.
संगमनेरच्या विद्रूपीकरणाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांचा ”एक संगमनेरकर’ म्हणून पुढाकार, मुख्याधिकाऱ्यांना कळकळीचे पत्र
संगमनेर नगरपरिषद आणि प्रशासन याबाबतीत कोणती भूमिका घेणार, हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे तांबे यांनी शेवटी नमूद केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी माहितीसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवली आहे.



संगमनेर – 
अवैध फ्लेक्समुळे शहराचे सौंदर्य हरपले –
स्वतःपासून सुरुवात आणि प्रशासनाकडे विनंती –
