
नाशिक/संगमनेर: राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तत्काळ त्यांच्या पाठीशी उभे राहून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि आकडेवारी ही फसवी असून, त्यातून शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ते नाशिक रोड येथे आयोजित उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ.शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष कोतवाल, बी. एम. संदीप, आकाश छाजेड, हनीफ बशीर, गणेश पाटील, मुन्ना ठाकूर, डॉ. सचिन सावंत, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, रईस शेख, ॲड. संदीप पाटील, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, शाहू खैरे, गौरव सोनार, माया काळे, उद्धव पवार, स्वाती जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला आहे आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने विना अट दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. परंतु, सध्याच्या सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन आता पाळण्याची खरी गरज आहे. शेतकऱ्यांना प्रति एकरी पुरेशी मदत जाहीर करून त्यांना संकटातून उभे राहण्यास पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी थोरात यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, तो राज्यघटनेवर आणि मूलभूत तत्वांवरचा हल्ला आहे. सध्या देशात दहशतवाद सुरू झाला असून, लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लढाई लढण्याची आवश्यकता आहे. यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.



