अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या काळात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना घडली आहे. जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजाच्या संजय वैरागर या तरुणाला गावातील १५ ते २० गावगुंडांनी अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे.
नेमकी घटना काय? – सोनई येथील रहिवासी असलेल्या संजय वैरागर या मातंग समाजाच्या तरुणाला त्याच गावातील १५ ते २० गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेले. तिथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या गुंडांनी क्रूरतेची हद्द ओलांडत तरुणाच्या हात-पायांवरून मोटारसायकल चालवून हात-पाय मोडले. इतकेच नव्हे तर ‘फायटर’ नावाच्या शस्त्राने तोंडावर जबर मारहाण केल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला. या विकृत गुंडांनी एवढ्यावरच न थांबता पीडित तरुणाच्या तोंडावर आणि शरीरावर लघवी करण्याचा घृणास्पद प्रकार केला आणि नंतर त्याला एका अज्ञात स्थळी टाकून पळ काढला.
https://x.com/VBAforIndia/status/1981317208019259481?t=Cg0c83xuCvmaI7fq_iCvhQ&s=19
आरएसएसच्या गुंडांकडून मारहाण झाल्याचा आरोप- वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे की, हे गावगुंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित आहेत. वंचितच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देत, मातंग तरुणाला आरएसएसच्या गावगुंडांकडून मारहाण झाल्याचे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद- मारहाणीत गंभीर जखमी झालेला संजय वैरागर सध्या अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव प्रा. किसन चव्हाण यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. याचवेळी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोन करून पीडित तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांनी कुटुंबीयांची व्यथा समजून घेत, लवकरच भेटायला येणार असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.
आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी- प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा. किसन चव्हाण यांना आरोपींविरुद्ध ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, दलित समाजातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून अमानुष मारहाण; प्रकाश आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला फोनद्वारे धीर, आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी
या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, दलित समाजातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




अहिल्यानगर: 







