महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत (TCS) नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणिलैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग करून त्यांचे धर्मांतर करण्याचा आणि त्यांना लैंगिक जाळ्यात ओढण्याचा हा भयानक कट समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या प्रकरणाची सुरुवात एका तरुणीच्या वागण्यातील बदलामुळे झाली. संबंधित तरुणीने हिंदू असूनही अचानक रोजे पाळण्यास सुरुवात केली, तिचा पेहराव बदलला आणि तिने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केली. मुलीच्या या संशयास्पद वर्तणुकीमुळे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, ज्यातून या संपूर्ण रॅकेटची माहिती समोर आली. तपास यंत्रणांना सुरुवातीला ठोस पुराव्यांची कमतरता होती, परंतु नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त मोनिका राऊत यांनी अत्यंत गुप्तपणे ‘अंडरकव्हर ऑपरेशन’ आखले.
या मोहिमेसाठी नऊ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणी असल्याचे भासवून संबंधित कंपनीत मुलाखती दिल्या आणि त्यांची निवडही झाली. तिथे दहा दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी कंपनीतील अंतर्गत हालचालींचे बारीक निरीक्षण केले.
तपासात असे आढळले की, तिथे मुस्लिम पुरुष सहकाऱ्यांकडून हिंदू तरुणींचा सतत विनयभंग केला जात होता. तसेच आरोपींचा एक खास व्हॉट्सॲप ग्रुप होता, ज्यावर ‘नया माल’ सारखे शब्द वापरून पुढील टार्गेट कोण असेल, याची चर्चा केली जात असे. तरुणींना आकर्षित करण्यासाठी हॉटेल आणि रिसॉर्टच्या ट्रिप्सचे आयोजन केले जात होते, जिथे पदोन्नतीचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केले जात होते.
तपासादरम्यान ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि व्हॉट्सॲप चॅट्समधून हे केवळ वैयक्तिक शोषण नसून एक संघटित रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले. या तरुणींना हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन आणि इस्लामची भलामण करणाऱ्या पीडीएफ पाठवून त्यांचे ब्रेनवॉशिंग केले जात होते.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अंसारी, शफी शेख, रजा मेमन, तौसीफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि दानिश शेख अशा सहा जणांना अटक केली आहे. निदा खान नावाची एक संशयित महिला सध्या फरार असून, तिचा मुख्य रोल मुलींचे मतपरिवर्तन करण्यात होता. धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीच्या एचआर हेड अश्विनी चैनानी यांना या प्रकाराची कल्पना असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नाशिक पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे, विशेषतः त्या नऊ महिला पोलिसांचे ‘नवदुर्गा’ म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांनी सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







