मका, कांदा, कापूस, डाळिंब आणि झेंडू पिकांचे मोठे नुकसान; उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार
संगमनेर – सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. तालुक्यातील १०८ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या २५,९७१ हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी २२ कोटी २० लाख रुपये इतकी भरपाईची रक्कम महसूल विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या या अतिवृष्टीने संगमनेर तालुक्यात मोठे नुकसान झाले. विशेषतः आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, पानोडी, उबरी बाळापुर, रहिमपूर, कोकणगाव, वडगावपान, जोर्वे, घारगाव, निमोण, समनापुरसह नदीकाठच्या अनेक गावांना याचा मोठा फटका बसला.
कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार, या नुकसानीत प्रामुख्याने मका, कापूस, कांदा, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या मुख्य पिकांचा समावेश आहे. यासोबतच भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची, फळपिकांमध्ये डाळिंब आणि फुलपिकांमध्ये झेंडू या नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात घारगाव भागातील कांदा पिकाचे नुकसान लक्षणीय आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्यानंतर कृषी विभागाने १०८ गावांमध्ये पंचनामे पूर्ण केले. यानंतर महसूल विभागाने तत्परता दाखवत शासनाकडून निधी उपलब्ध होताच दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केली. दिवाळीच्या दिवशीही हे काम सुरू होते.
या प्रक्रियेत आधार कार्ड लिंक नसणे किंवा बँक खात्याच्या माहितीत त्रुटी असल्यामुळे काही अत्यल्प शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरित रक्कम लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे.
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर महसूल विभागाने २२ कोटी २० लाख रुपये रक्कम वर्ग केली आहे. आधार कार्ड लिंक नसणे किंवा बँक खात्याची माहिती सदोष असणे अशा कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होऊ शकली नाही, त्या सर्व त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच या उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही रक्कम वर्ग होईल. – धीरज मांजरे, तहसीलदार संगमनेर.
संगमनेर तालुक्यातील १०८ गावांमध्ये २५ हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात मका, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कांदा, टोमॅटो, डाळिंब आणि झेंडू यांसारख्या पिकांचा समावेश होता. – रेजा बोडके, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर.
अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा: संगमनेर तालुक्यातील २६ हजार हेक्टर पीक नुकसानीसाठी २२.२० कोटींची मदत थेट बँक खात्यावर
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरित रक्कम लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे.



संगमनेर – 
कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार,
या प्रक्रियेत आधार कार्ड लिंक नसणे किंवा बँक खात्याच्या माहितीत त्रुटी