संगमनेर – गाईंची दूध उत्पादकता अधिक वाढवणे गरजेचे असून खाजगी संस्था नफा कमवण्यासाठी कार्यरत असतात, तर सहकार हे सर्वसामान्यांच्या समृद्धीचे व्रत आहे, असे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी चळवळीचे महत्त्व स्पष्ट केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्यावतीने आयोजित प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी या कार्यशाळेत थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्याच्या समृद्धीमध्ये मोठी वाढ झाली. सहकारामुळे खाजगी संघांवर वचक राहतो, कारण खाजगी संस्थांचा उद्देश केवळ नफेखोरी असतो आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता किंवा चांगला भाव नसतो. याउलट, सहकारी दूध संघ सहकाराचे व्रत जपतो.
सहकाराचे विचार मंथन व्हावे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. देशी गाईंना असलेल्या मर्यादांनंतर आलेल्या संकरित गाईंमुळे दूध व्यवसाय वाढला आणि त्यातून ग्रामीण आर्थिक समृद्धी निर्माण झाली. दूध व्यवसाय अत्यंत कष्टाचा असून, प्राथमिक संस्थांनी यामध्ये शिस्त पाळणे आवश्यक आहे. गोठा आणि दुध काढण्याचे मशीन यांची स्वच्छता महत्त्वाची आहे. तसेच, कमी गाई संख्येमध्ये जास्त दूध उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक काम होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी प्राथमिक संस्थांनी दोन वेळेस दूध संकलन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.
याचबरोबर, दूध संघाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या मुरघास आणि मुक्त संचार गोठा या संकल्पना अत्यंत प्रभावी असल्याचे सांगत, त्यांनी शेतकऱ्यांना क्वालिटीचा मुरघास बनवण्यासाठी मार्गदर्शन करावे लागणार आहे. कारण 1982 मध्ये आपण प्रथमतः मूरघास केला होता, यामुळे गाईंना पौष्टिक आहार मिळतो. स्वच्छ व गुणवत्तेचे दूध हे राजहंसचे वैशिष्ट्य असून, उपपदार्थही अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. दूध संघाने अत्यंत काटकसर व पारदर्शक कामकाज करून रिबेट आणि चांगला भाव दिला आहे, त्यामुळे खोटा प्रचार करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दूध व्यवसाय कष्टाचा असला तरी समाधान देणारा असल्याचे सांगितले. गावपातळीवरील पदाधिकारी आणि सचिवांचे चांगले काम हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी सहकारी दूध संघाला खाजगीकरणाचे मोठे आव्हान असून, खाजगी संघांना कोणतेही बंधन नसतात, तर सहकाराला खूप बंधने आहेत. खाजगी दूध संघ व संकलन सेंटरवाले ऍडव्हान्स देतात आणि सावकारी पद्धतीने गुंतवून टाकतात, वेळप्रसंगी अनामत रकमा कापतात. सहकारात मात्र कायम शेतकऱ्यांचे हित जपले जाते. हा सहकार आपल्याला टिकवायचा आहे आणि वाढवायचा आहे.
उत्पादकता वाढवण्यासाठी इम्पोर्टेड सिमेन, मुरघास, मुक्त संचार गोठा आणि गाईंच्या आरोग्याची काळजी असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. प्राथमिक सहकारी संस्थांनी स्वच्छतेवर अधिक भर देऊन चार डिग्रीपर्यंतचे दूध सातत्याने कसे पुरवता येईल याकरता लक्ष द्यावे, तसेच दूध संकलन वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे. प्राथमिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विद्युत सोलरसह विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गाईची कास, दूध काढण्याचे मशीन स्वच्छ करण्याबरोबर शेतकऱ्यांनी गोठा कायम स्वच्छ ठेवला पाहिजे आणि प्राथमिक संस्थांनी बर्कुलर व त्यांची स्वच्छता ठेवून दोन वेळेस दूध संकलन करावे, असे आवाहन करत राजहंस दूध संघाचे सर्व पदार्थ अत्यंत गुणवत्तेचे असून, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी या उपपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक ॲड. अनिल भांगरे यांनी सहकारी संस्थांचे कायदे व नियम यावर, तर कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी दुभत्या गाईंचा आहार, संगोपन व स्वच्छ दूध निर्मिती यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आर. बी. राहणे, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रमराजे थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, गोरख नवले, डॉ. प्रमोद पावसे, के.के. थोरात, सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक ॲड. अनिल भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित खिलारे यांनी केले, तर व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.



संगमनेर – गाईंची दूध उत्पादकता अधिक वाढवणे गरजेचे असून खाजगी संस्था नफा कमवण्यासाठी कार्यरत असतात, तर सहकार हे सर्वसामान्यांच्या समृद्धीचे व्रत आहे, 
याचबरोबर, दूध संघाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या मुरघास आणि मुक्त संचार गोठा या संकल्पना अत्यंत प्रभावी असल्याचे सांगत,
चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दूध व्यवसाय कष्टाचा असला तरी समाधान देणारा असल्याचे सांगितले.
