संपदा मुंडे या होतकरू महिला डॉक्टरच्या अकाली मृत्यूने सारा महाराष्ट्र सुन्न झाला असताना या डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याला मारणार्या मारेकर्यांची रीघ पाहून या राज्यातल्या जनतेला झोप कशी लागते, असा प्रश्न पडला आहे. इतका मुर्दाड झालेला महाराष्ट्र कोणीच कधी पाहिला नाही. ज्याचं नाव या तरुणीने घेतलं, तोच निर्दोष असल्याचं सांगण्यासाठीचा आटापिटा पाहिला की सत्तेतली माणसं किती पिपासू झालीत हे लक्षात येतं. काँग्रेसच्या अनेक सत्ता या राज्याने पाहिल्या. पण असले पिपासू स्मरणात नाहीत. राजकारणाचा बोलबाला करत जो तो मारेकर्याचा पाठीराखा बनतो, तेव्हा महाराष्ट्र फुकट गेल्यात जमा झाला आहे, असंच वाटतं. इतकी अवनती या राज्याची झाली आहे. एकेकाळी महिलेच्या संरक्षणार्थ तिच्या मागे ठामपणे उभी राहणारी पिढी आज अबलेला सोडत नाही, हे भीषण वास्तव आपण पहातो आहोत. या अबलेवर नको नको ते दोषारोप लावत ही पिळावळ एका नालायकासाठी इतक्या वकुबीने पुढे आलेली पाहून महाराष्ट्राची मान शरमेने खाली न गेली तर नवलच. सत्तेत सामील झालेल्यांसाठी यंत्रणा कशी काम करते, याचं वास्तव या प्रकरणातून पुढे येतं.
बीडच्या वडवणी तालुक्यातील एका शेतकर्याची मुलगी, जिच्या शिक्षणासाठी ऊसतोड करून कष्टातून पै पै जमवणारा शेतकरी बाप तिला डॉक्टर काय बनवतो, आणि कोण्या एका नेत्याच्या दबावाने तिचा बळी काय जातो, सारं काही भयानकच. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडावं यापासून तिची हत्या करण्यापर्यंत सारं काही चित्रपटाला शोभणारं कथानक घडूनही सत्ताधारी ज्या प्रकारे संबंधिताला वाचवण्याच्या मागे लागलेत हे पाहून हे राज्य कोणत्या वळणावर आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. सत्तेत असलेल्या बदमाश नेत्यासाठी जिल्ह्याची आणि तालुक्याची यंत्रणा कशी राबत असते, हे ही या कथानकातलं एक वास्तव.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या अकाली जाण्याला ज्या ज्या व्यक्ती कारण ठरल्या त्यात तिथल्या माजी खासदार असलेल्या रणजितसिंग निंबाळकर याचं नाव आघाडीवर आहे. घटनेला दोन दिवस जात नाही तोच या माणसाला वाचवणार्यांची फौज पुढे आली. त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असणं ही महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट होय. फडणवीस यांच्या क्लिनचिटच्या जाहीर वक्तव्याने या प्रकरणाची चौकशी होईल की नाही इथपासून शंकांचा काहूर माजला आहे. मुख्यमंत्र्यांच्या क्लिनचिटनंतर सत्ताधारी पक्षाच्या मंडळींमध्ये त्याला वाचवण्याची जणू अहमहिकाच लागली. जो तो त्याला वाचवण्याची जणू सुपारीच घेऊन पुढे आला आहे. ज्यांनी अबलेला न्याय द्यावा, त्या प्रत्येकाने तिलाच दोष दिला. शिवाय तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. ती गतप्राण होऊनही तिला मारू लागला. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यातरी तिला न्याय देतील असं वाटत होतं. पण हाय, त्यातर कसाई निघाल्या. आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहोत याचं भानही त्यांना राहिलं नाही. सत्तेतल्या एका व्यक्तीसाठी आपण नीच थर गाठतो आहोत, याचं या बाईंना काहीच वाटलं नाही.
डॉक्टर तरुणीच्या हातावरील सुसाईड नोटवर ज्यांची ज्यांची नावं आहेत ते सगळे सत्तेशी जवळकी ठेवणारे आहेत. त्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्यातल्या अनेकांवर याआधी असंख्य आरोप झाले. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या कारनाम्यांची जंत्री वाचली तेव्हा सार्यांची झोप उडाली. ज्या डॉक्टर मुलीचा मृत्यू सायंकाळी झाला तिच्या व्हॉटस्अॅपवरील स्टेटस रात्री अकरा वाजता कसा काय लाईक केला गेला, हे कोडं न सुटणारंच. अंधारे यांनी माजी खासदाराच्या कृत्याचा पंचनामा जाहीरपणे पत्रकार परिषदेत घेतल्यावर खासदाराच्या ताटातल्या लोकांनी त्यांना गलिच्छ भाषा वापरत त्यांची अवकात काढण्याचा प्रयत्न केला. खासदाराच्या वकिलाने 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे जाहीर कार्यक्रमात माजी खासदाराच्या नेतृत्व गुणांचं कौतुक करताना मृत युवतीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री का बोलले, हे कळायला मार्ग नाही.
डॉ. संपदा यांच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या चौकशीप्रकरणात माजी खासदार आणि त्यांच्या दोन पीएंकडून येणार्या सातत्याच्या दबावाचा उल्लेख सर्वश्रृत होता. कोणी लष्करातील निंबाळकर नावाचा अधिकार्याची पत्नी भाग्यश्री मारुती पंचांगने हिच्या मृत्यूनंतर तिचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदावर प्रचंड दबाव होता, असं भाग्यश्रीच्या आईने सांगितलं. अंडरट्रायल कैद्याच्या शवविच्छेदन अहवाल आपल्याला हवा तसा देण्यासाठी येणार्या दबावाचा उल्लेख भर पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावरून परिस्थितीचं गांभीर्य उघड करतं.
स्वराज कारखान्याचा उल्लेख करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेबूब शेख यांनी तर सत्ताधार्यांची बोलती बंद करून टाकली. एकटे शेख बोलले नाहीत तर बीडचे आमदार सुरेश धस यांनीही थेट नाव घेत माजी खासदारावर टीका केली. धस यांचे कट्टर स्पर्धी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही संपदाला न्याय द्यायचा आहे. पंकजा मुंडेंनीही घटनेचा निषेध केला आहे.
संपदाने केलेल्या तक्रारीत ज्या पोलीस उप निरीक्षक प्रशांत बनकर याचा त्याने बलात्कार केल्याचा उल्लेख आहे, त्या उप निरीक्षकाची चौकशी महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाकडे सोपवण्यात आली आहे. संपदावर चिखलफेक करणार्या मंत्री जयकुमार रावल यांच्याशी सख्य असलेल्या या पोलीस निरीक्षकाच्या चौकशीतून काय बाहेर येईल, हे इथे सांगायची आवश्यकता नाही.
जिल्ह्यातील उद्योजक असलेल्या दिगंबर आगवणे यांनी माजी खासदाराने आपली चार कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडे केला होता. आगवणे कुटुंबावर माजी खासदारांकडून करण्यात आलेल्या अत्याचारांचे पाढे सुषमा अंधारे यांनी वाचले तेव्हा एक माजी खासदार कोणत्या थराला जाऊ शकतो, हे लक्षात आलं. फलटण पोलीस ठाण्यात जयश्री यांच्या कुटुंबाविरोधात 25 गुन्हे दाखल आहेत. हे सारे गुन्हे माजी खासदाराच्या सांगण्यावरून लावण्यात आल्याचा आरोप जयश्री आगवणे यांनी केला आहे. यात मोक्का आणि एमपीडीएसारखे गुन्हेही नोंदवण्याचा प्रताप फलटण पोलिसांनी केला. या अत्याचाराला कंटाळून आगवणे कुटुंबातील वर्षा आणि हर्षा या दोन मुलींनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आली आहे. यातील एका मुलीच्या सुसाईड नोट त्या मुलीनेच वाचून दाखवली. यातही माजी खासदाराच्या नावाचा उल्लेख आहे. या मुलींनी राज्य महिला आयोगालाही पत्र पाठवून अवगत केलं होतं. मात्र नेहमीप्रमाणे आयोग झोपेत होतं. ईडी आणि सीबीआयच्या धाडी पाडण्यासाठी तेव्हा फलटण फेमस बनलं होतं. राहुल गांधी यांनी या घटनेची घेतलेली दखल मुख्यमंत्र्यांना झोंबलेली दिसते आहे. संपदाची ही आत्महत्या नसून ती संस्थात्मक पध्दतीने केलेली हत्या असल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी तिच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.
ननावरे नावाच्या व्यक्तीने केलेली आत्महत्या अशाच दाबल्या गेलेल्या हत्येचं प्रकरण म्हणता येईल. गोपाळ बदने या पोलीस उपनिरीक्षाविरोधी त्याने बलात्कार केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला त्या उपनिरीक्षकाच्या चौकशीचं काम पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनावणे यांच्याकडे देण्यात आलंय. हे सोनावणे म्हणजे डॉ. मुंडे हिच्यावर संशय घेणारे मंत्री जयकुमार गोरे यांचे पाठीराखे मानले जातात. हत्या झालेल्या एका मुलीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदावर दबाव होता असा आरोप भाग्यश्री मारुती पंचांगने या मुलीच्या आईने केला आहे. मुलीचं लग्न लष्कर अधिकारी अजिंक्य निंबाळकर यांच्याशी झाला होता. अचानक मुलीच्या मृत्यूची बातमी आली. मात्र चौकशी झाली नाही.
रविवार विशेष लेख — अबला एक मारेकरी अनेक
संपदावर चिखलफेक करणार्या मंत्री जयकुमार रावल यांच्याशी सख्य असलेल्या या पोलीस निरीक्षकाच्या चौकशीतून काय बाहेर येईल, हे इथे सांगायची आवश्यकता नाही.






डॉक्टर तरुणीच्या हातावरील सुसाईड नोटवर ज्यांची ज्यांची नावं आहेत ते सगळे सत्तेशी जवळकी ठेवणारे आहेत.
जिल्ह्यातील उद्योजक असलेल्या दिगंबर आगवणे यांनी