संगमनेर: संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ आणि ड्रग्सची वाढती तस्करी अत्यंत चिंतेची बाब बनली असून, यामागे ‘हप्तेखोरी’ हेच एकमेव कारण असल्याची थेट टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी ‘हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून’ तालुक्यात काळे धंदे सुरू करणाऱ्या लोकांवरही सडकून टीका केली. तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव खेमनार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, गेली चाळीस वर्षे आपण हा तालुका परिवार म्हणून सांभाळला आणि वाईट प्रवृत्तींना थारा दिला नाही. आपण वारकरी संप्रदायाचे आणि पुरोगामी विचारांचे पाईक आहोत. संत परंपरेचा आणि मानवतेचा विचार आपण पुढे नेला आहे. कधीही भेदभाव केला नाही. मात्र, आता कधी न दिसणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेरमध्ये येऊ लागले आहेत. बस स्थानकासमोर कार्यक्रम होत आहेत. हे लोक धर्माच्या नावावर काळे धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. यामागे कुणाचे आशीर्वाद आहे हे ओळखा, असे ते म्हणाले.
थोरात यांनी अत्यंत गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की, संगमनेरमध्ये ड्रग्स, अमली पदार्थ, इंजेक्शन आणि लिक्विड यांसारख्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जे लोक शेजारील तालुक्यांमध्ये होते आणि त्यांनी अनेक तालुके उद्ध्वस्त केले, ते आता आपल्याकडे येऊ लागले आहेत. या वाढलेल्या तस्करीमागील एकमेव कारण सुरू झालेली हप्तेखोरी आहे, असा थेट आणि गंभीर आरोप थोरात यांनी केला.
काही लोकांनी सोपे राजकारण स्वीकारले आहे. कोणतेही काम न करता भगवी टोपी घालायची आणि फिरायचे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक धर्माच्या नावावर फिरत आहेत. गुन्हेगाराला जात-धर्म नसतो; तो केवळ गुन्हेगार असतो. मात्र, आता धर्माच्या नावावर गावोगावी गुंड तयार झाले आहेत आणि दहशतवाद वाढला आहे.
संगमनेरमध्ये सहा महिन्यापासून काहींचे फ्लेक्स लोंबकळत आहे. आपण आपले फ्लेक्स काढून घेतले पण काहींनी त्यावर फ्लेक्स लावून दादागिरी चालवली आहे. वेळेला त्यांना संगमनेरची ताकद दाखवावी लागणार आहे. चाळीस वर्षात हा तालुका आपण उभा केला. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. निळवंडे थेट पाईपलाईन योजनेतून आलेल्या पाण्यानेच टीका करणाऱ्यांनी अभ्यंग स्नान केले.
थोरात यांनी प्रशासनाकडे या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. गुन्हेगारांवर आणि त्यांच्या मागे असलेल्या शक्तींवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या अशा लोकांना माफी नसावी, असे ते ठामपणे म्हणाले.
थोरात यांनी संगमनेरमधील अस्वस्थ वातावरणावर चिंता व्यक्त करत निळवंडे थेट पाईपलाईन योजना आणि तालुक्यात केलेल्या विकासाचा उल्लेख करत, ४० वर्षांत आपण ही भूमी जपली असल्याचे सांगितले. परंतु, सध्याच्या वाढत्या अमली पदार्थ तस्करीमुळे तरुण पिढीचे भविष्य अत्यंत चिंताजनक बनले आहे. यामुळे सर्व संगमनेरकरांनी आपल्या पाल्यांच्या बाबत अधिक सतर्क राहावे आणि तरुणांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून भरकटून जाऊ नये, असे कळकळीचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
ड्रग्स तस्करीमागे ‘हप्तेखोरी’ हेच एकमेव कारण: ‘हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून काळे धंदे’ -माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप
सध्याच्या वाढत्या अमली पदार्थ तस्करीमुळे तरुण पिढीचे भविष्य अत्यंत चिंताजनक बनले आहे. यामुळे सर्व संगमनेरकरांनी आपल्या पाल्यांच्या बाबत अधिक सतर्क राहावे आणि तरुणांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून भरकटून जाऊ नये, असे कळकळीचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.





काही लोकांनी सोपे राजकारण स्वीकारले आहे

