


नान्नज दुमाला-पिंपळे परिसरासाठी मंजूर उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करण्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी
संगमनेर – निळवंडे धरणाचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूर चारीचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच, त्यांनी नान्नज दुमाला, पिंपळे परिसरासाठी मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करून कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्याचे स्वप्न जनता खूप दिवसांपासून ऐकत आहे, असेही ते म्हणाले.
पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, आर्किटेक बी. आर. चकोर, अजय फटांगरे, महंत बुवाजी बाबा पुणेकर, महंत बबनराव सांगळे, संपतराव गोडगे, धनराज गुट्टे, अॅड. ज्ञानेश्वर सांगळे, रोहिदास सानप, ज्ञानेश्वर सानप, देवराम गुळवे, जनार्दन कासार, त्रंबक गडाख, डॉ. दत्तात्रय गडाख, साहेबराव गडाख, रमेश सानप, पांडुरंग फड, सखाराम शरमाळे, सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर, सरपंच मीनाताई कोटकर आदींसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येईल तेव्हा आनंदच आहे आणि जनता हे खूप दिवसांच ऐकत आहे. चाळीस वर्षांत सातत्याने काम करून तालुका उभा केला. विकासाच्या योजना राबवून सुसंस्कृत आणि वैभवशाली तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण केली. सध्या शहरात व तालुक्यात अवैध धंदे वाढले असून, येणारी पिढी उद्ध्वस्त होते की काय याची चिंता निर्माण झाली आहे. यामागे कोण आहे ते ओळखा. हे सर्व आपल्याला दुरुस्त करायचे असून, सर्वांनी शाश्वत विकासाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे; पण आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेऊन सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ही भोजापूर चारी निर्माण झाली असून, ते स्वतः भर उन्हात चारी कामावर येऊन बसायचे. भोजापूर चारी १९९२ मध्ये कारखान्याने ८२ लाख रुपये खर्च करून तयार केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळा निधी चारीसाठी टाकला आणि पाणी दरवर्षी पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. यावर्षी मे महिन्यापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी आले. ही आनंदाची गोष्ट आहे. ही चारी काही मागील एक वर्षात झालेली नाही, पण ज्यांना कधी चारी माहीत नव्हती ते लोक आता बोलत आहेत. निळवंडे धरण जनतेने विसरावे म्हणूनच भोजापूरचा बोलबाला केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला.
या भागाला पाणी मिळावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून, निळवंडे कालव्यांमधून उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. यामध्ये निमोन, पळसखेडे, कऱ्हे, नान्नज दुमाला, सोनोशी, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव, तिगाव, बिरेवाडी यांच्यासह ११ गावांसाठी या योजना होत्या. मात्र, महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या मंडळीने उपसा जलसिंचन योजना रद्द (स्थगित) केल्या. या उपसा जलसिंचन योजनेतून या भागाला पाणी देणे शक्य आहे, त्यासाठी आपण नियोजन केले होते. त्यामुळे तात्काळ त्या सुरू कराव्यात, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्यातील अत्यंत विकसित आणि सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीत जे झाले, त्याची चिंता आणि काळजी संपूर्ण राज्याला पडली आहे. आपण कायम सर्वांनी एकजुटीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे.
प्रास्ताविक बी. आर. चकोर यांनी केले, सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ व अनिल घुगे यांनी केले, तर सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर यांनी आभार मानले.




