संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच अनेक पाळीव जनावरे बिबट्यांचे बळी ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून उमटला आहे.
RGSSने एका निवेदनाच्या माध्यमातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्या कडे लक्ष वेधले आहे. आर एफ ओ सांगळे आणि ताम्हाणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका चिंताजनक असून, अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मेंढवण येथील हिराबाई एकनाथ बढे यांचा मृत्यू झाला, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याव्यतिरिक्त सावरगाव तळ येथील मेंढी तळावर सुशाबाई व भास्कर हरिभाऊ पांडे हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले, तर हिवरगाव पावसा येथील अर्चना संदीप टेमगिरे यांनाही बिबट्याने लक्ष्य केले. डिग्रस येथील शाळकरी मुलगी प्रगती शाळेत जाताना वाटेत बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात जखमी झाली होती. याशिवाय, बोटा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सातत्याने होत असलेल्या या घटनांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध यांच्यात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने आत्तापर्यंत काही बिबटे पकडले असले तरी, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नरभक्षक बिबटे अजूनही मोकाट असून सार्वजनिक सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत.
‘गोळ्या घालून ठार करा’ ते सुरक्षित कंपाऊंड; RGSS च्या प्रमुख मागण्या – या जीवघेण्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) ने वन विभागाकडे तातडीने आणि निर्णायक पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. यात आमच्या भागात सध्या सक्रिय असलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याची तातडीने परवानगी द्यावी. यासोबतच, भागातील बिबट्यांचे प्रमाण लक्षात घेऊन बिबट नियंत्रणासाठी एक विशेष टास्क फोर्स ताबडतोब तैनात करावी. बिबट नियंत्रण ऑपरेशनसाठी पुरेशा प्रमाणात निधी, तंत्रज्ञान आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी बिबट्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रजनन नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे वेगाने पाठपुरावा करावा. पकडलेल्या बिबट्यांचा पुन्हा मानवी वस्तीत शिरकाव टाळण्यासाठी वन विभागाच्या हद्दीत 20 फूट उंचीचे भक्कम व सुरक्षित तार कंपाऊंड उभे करण्याची महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. तसेच, बिबट प्रवण, प्रभावित क्षेत्रातील रस्त्यालगत सूचना फलक लावणे आणि अलार्म, अलर्ट व्यवस्था कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे.
या निवेदनावर राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) चे समन्वयक म्हणून अरुण चव्हाण, बाळासाहेब घोडके, कल्याण जोर्वेकर, राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव व मोहसीन खलील शेख आदींचा समावेश आहे.
४ महिन्यांत २ बळी; संगमनेरमध्ये बिबट्यांचा हाहाकार! वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह, RGSS ने निवेदनाच्या माध्यमातून केली चिंता व्यक्त
या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून उमटला आहे.







