संगमनेर | प्रतिनिधी
आगामी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजीत तांबे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. संगमनेरचा निवडणुकीचा जाहीरनामा आता जनतेच्या थेट सहभागातून तयार होणार आहे. ‘संगमनेर २.०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा ठरवला जाणार आहे.
गंगामाई घाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार तांबे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा!
आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी संगमनेर शहराच्या आजवरच्या प्रगतीचे पुनरावलोकन केले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभाग या तत्त्वांवर आदर्श विकासाचे मॉडेल उभे केले. आज संगमनेरमध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो, उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आणि वृक्षारोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या ९ वर्षांत संगमनेर नगरपरिषदेला २७ कोटींहून अधिक बक्षिसे आणि पुरस्कार मिळाले आहेत.
शहरातील उत्तम सुविधांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, स्वतंत्र स्टेडियम, नाट्यगृह, वीज सबस्टेशन, चौपदरी महामार्ग, रिंग रोड, एज्युकेशन हब, ३५ हून अधिक उद्याने, २५ हजार झाडे आणि २५० हेरिटेज वृक्ष यामुळे संगमनेर शहर आता ‘गार्डन सिटी’ म्हणून ओळखले जाते. आमदार तांबे यांनी हा सर्व विकास भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभारामुळेच शक्य झाल्याचे सांगितले.
QR कोडद्वारे थेट सहभाग आणि ‘विकास परिषद’ – या वेळेसचा जाहीरनामा ‘जनतेकडून, जनतेसाठी’ तयार करणार असल्याचे स्पष्ट करताना आमदार तांबे म्हणाले की, संगमनेरचा विकास हा केवळ निवडणुकीचा विषय नसून, तो प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि जबाबदारी आहे. या मोहिमेअंतर्गत लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या:
QR कोडद्वारे सूचना – लोकसहभाग वाढवण्यासाठी आमदार तांबे यांनी उपक्रमाचा QR कोड देखील प्रसिद्ध केला आहे. हा कोड स्कॅन केल्यावर नागरिकांना थेट Google Form वर आपले मत, शहरातील गरजा आणि विकासासाठीच्या कल्पना सोप्या शब्दांत नोंदवता येतील.
फक्त नागरिकांपुरता संवाद न ठेवता, व्यापारी, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, महिला तसेच शहरातील विविध संस्था, संघटना, व्यावसायिक मंडळे आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी थेट चर्चा केली जाईल. या संदर्भात शहरात विकास परिषद किंवा टाऊन हॉल मीटिंग्ज आयोजित केल्या जाणार आहेत, जिथे नागरिकांना आपले मत, कल्पना मांडता येतील. प्रत्येक क्षेत्रातील विषयतज्ज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून या जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार केला जाईल, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
‘संगमनेर २.०’: एक नवे स्वप्न, एक नवी दिशा – हा जाहीरनामा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून, संगमनेरच्या पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा असेल. शहर नियोजन, वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, आणि डिजीटल सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागरिकांचा अभिप्राय समाविष्ट करून जाहीरनामा अधिक समृद्ध आणि जनाभिमुख बनविला जाईल. संगमनेरचा प्रत्येक नागरिक शहराच्या भविष्यातील दिशा ठरविणारा भागीदार आहे. त्यामुळे तुमचा प्रत्येक विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे आवाहन आमदार तांबे यांनी शहरवासियांना केले.
जनतेचा जाहीरनामा! आमदार सत्यजीत तांबेंची ‘संगमनेर २.०’ ची घोषणा: QR कोड स्कॅन करा आणि शहराचे भविष्य ठरवा!
संगमनेरच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार होणार 'लोकसहभागातून'!



संगमनेर | प्रतिनिधी
शहरातील उत्तम सुविधांचा उल्लेख करताना ते म्हणाले की,
‘संगमनेर २.०’: एक नवे स्वप्न, एक नवी दिशा –