

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
राहुरी/अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी राहूरी तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘कदम टोळी’वर अत्यंत कठोर कारवाई केली आहे. खून, दरोडा, आणि शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम याच्यासह एकूण चार सदस्यांना जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 अंतर्गत ही कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम (रा. धामोरी खुर्द) सोबतच स्वप्नील रमेश बोरुडे (रा. चिंचविहिरे), गणेश नामदेव जाधव (रा. बारगांव नांदूर), आणि नितीन दत्तात्रय हरिश्चंद्रे (रा. तमनर आखडा) यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नितीन कदम आणि त्याच्या टोळीची दहशत इतकी होती की, सामान्य नागरिक त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. या टोळीने 2014 पासून अनेक गंभीर गुन्हे केले होते आणि त्यांच्या हिंसक कारवायांनी नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणली होती.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाची तपासणी आणि शिफारस मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तडीपारीचे आदेश जारी केले. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण जिल्हा पोलिसांनी दिले आहे.



पोलीस सूत्रांनुसार,
