

संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोणाच्या चुकीमुळे कोसळला, हे संगमनेर शहर आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही दुर्घटना घडली.
जनतेचा तीव्र विरोध असतानाही, सत्ताधाऱ्यांनी एस.टी.पी (STP) गटारीचा जो वादग्रस्त आराखडा तयार केला, त्यातूनच या समस्येने मूळ धरले असल्याचे टीका शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे.
सध्या पालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी म्हणाले, तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे साहेब यांच्या निधीतून बांधलेल्या, अतिशय सुस्थितीत असलेल्या या पुलाचे गटारीचे काम सुरू करण्यासाठी सुमारे पाच फूट फाउंडेशन विनाकारण तोडण्यात आले. या कामाचे कंत्राट काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ठेकेदाराला, तर खोदकामाचे कंत्राट एका माजी काँग्रेस उपनगराध्यक्षाकडे सोपविण्यात आले होते.
या कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे हा पूल कोसळला. धार्मिक स्थळे आणि शैक्षणिक संस्थांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा तुटल्याने शाळकरी मुलांसह परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. अशा कठीण काळात, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती ओळखून, राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि तत्कालीन भाजप विधानसभा प्रमुख असलेले विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याला यश आले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या पूल बांधकामासाठी भरघोस निधी तातडीने मंजूर करून दिला. निधी मिळूनही ठेकेदाराकडून कामाची गती संथ असल्यामुळे, आमदार अमोल खताळ पाटील यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले आणि विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली होती.
आमदार खताळ यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि वैयक्तिक लक्ष दिल्यामुळेच, शाळा सुरू होण्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण झाले आणि तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी हे काम पूर्ण होऊ नये यासाठी अनेक राजकीय अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार अमोल खताळ पाटील यांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडून पुलाचा प्रश्न मार्गी लावला, असे शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
एकूणच, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे पूल कोसळला आणि महायुतीच्या प्रयत्नांमुळे व आमदार खताळ यांच्यामुळेच हा महत्त्वाचा पूल कमी वेळेत पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दूर झाली, असे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. सूर्यवंशी यांच्या टीकेनंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.



या कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे हा पूल कोसळला.
