संगमनेर – म्हाळुंगी पुलाच्या कामातील अडथळ्यांवरून सुरू झालेल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
१५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित बातमीत सूर्यवंशी यांनी तांबे यांच्यावर काँग्रेस पुरस्कृत आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले, असा गंभीर आरोप केला होता. या संपूर्ण आरोपाला पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा ठरवत आमदार तांबे यांनी सूर्यवंशी यांना चार दिवसांत आरोप सिद्ध करण्याची किंवा बिनशर्त माफी मागण्याची मुदत दिली आहे.
अॅड. अमोल कारभारी घुले यांच्यामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, म्हाळुंगी पुलासाठी लागणारा वसंपूर्ण निधी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केला होता; शिवसेना किंवा त्यांच्या नेत्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यांनी पुढे खुलासा केला की, नाटकी नाल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी नगरपालिकेने पुढे व्यावसायिक संकुलाकडे वळवला आणि नंतर तोच निधी पुन्हा वळवून म्हाळुंगी पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे तांबे यांच्यावर पुलाचे काम रखडवण्याचा आरोप करण्यास कोणताही आधार नाही.
आमदार तांबे यांनी नोटीसमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, ते पूर्णपणे अपक्ष म्हणून निवडून आलेले असून त्यांनी विधानपरिषदेत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले नाही. याउलट, आरोप करणाऱ्यांचे ज्येष्ठ नेते कधी त्यांना भाजपचे, तर कधी काँग्रेसचे असल्याचे म्हणतात; ही विधाने गोंधळलेल्या अवस्थेत आणि अज्ञानाने केलेली असून, यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे.
नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सूर्यवंशी यांच्या या खोट्या माहितीमुळे आमदार तांबे यांची सार्वजनिक प्रतिमा खराब झाली आहे आणि यामुळे कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता – कलम ३५२, ३५३, २०६ अन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम ६६(D) या सर्व तरतुदींनुसार सूर्यवंशी यांच्या विरोधात १० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा तसेच गुन्हा नोंदविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सूर्यवंशी यांनी चार दिवसांच्या आत दोन लायक साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी माफी मागावी तसेच त्याला वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या मुदतीत माफी न मिळाल्यास, कायदेशीर पर्याय अवलंबणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार तांबे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संगमनेरच्या स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून, हा वाद माफी येते की थेट न्यायालयीन संघर्षाकडे वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१० कोटींच्या मानहानी दाव्याचा ‘बॉम्ब’: म्हाळुंगी पुलाच्या वादावरून सत्यजीत तांबे आक्रमक, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखांना चार दिवसांची मुदत! संगमनेरच्या राजकारणात खळबळ
आमदार तांबे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संगमनेरच्या स्थानिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून, हा वाद माफी येते की थेट न्यायालयीन संघर्षाकडे वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





अॅड. अमोल कारभारी घुले यांच्यामार्फत
नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,