संगमनेर: (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे. राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून, या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
माजीमंत्री थोरात म्हणाले की, महायुतीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीचे वातावरण आहे. हे मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. ही केवळ सुरुवात आहे; पुढे याचा मोठा राजकीय स्फोट दिसेल. थोरात यांच्या या विधानामुळे महायुतीतील अस्थिरतेच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
भाजपकडून काँग्रेस व महाविकास आघाडीवर होणाऱ्या घराणेशाहीच्या टीकेला थोरात यांनी जशास तसे उत्तर दिले. घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला काहीही नैतिक अधिकार नाही. त्यांच्याच पक्षात अनेक लोकप्रतिनिधी एकाच कुटुंबातून येतात आणि उच्च पदांवर विराजमान आहेत, असे थोरात म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेने स्वायत्त आणि निर्भीड राहिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने आयोग स्वतःचे निर्णय घेत नाही, तर बाहेरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीच अंमलबजावणी होते असे दिसते. त्यामुळेच लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळला आहे, अशी स्पष्ट टीका त्यांनी केली.
याउलट, महाविकास आघाडीची घडी अधिक मजबूत होत असल्याचा दावा थोरात यांनी केला. राजकारणात समविचारी लोक आणि पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी लोकशाही, सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांची बाजू घेणारी आहे. या भूमिकेमुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये अधिक मजबूत होऊ. महाविकास आघाडी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
भाजप व महायुतीविरोधात लढण्यासाठी व्यापक रणनीती आखल्याचे सांगत थोरात म्हणाले, भाजप आणि महायुतीची विचारसरणी आमच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांचा पराभव कसा करायचा, त्यांचे नामोहरण कसे करायचे आणि विजय कसा मिळवायचा याचा विचार आम्ही करत आहोत.
महायुतीत धुसफूस! थोरात यांचा खळबळजनक दावा: लवकरच अंतर्गत ‘बॉम्ब’ फुटेल, भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा हक्क नाही
निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेने स्वायत्त आणि निर्भीड राहिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने आयोग स्वतःचे निर्णय घेत नाही, तर बाहेरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीच अंमलबजावणी होते असे दिसते. त्यामुळेच लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळला आहे



संगमनेर: (प्रतिनिधी) – 
भाजपकडून काँग्रेस व महाविकास आघाडीवर 
याउलट, महाविकास आघाडीची घडी अधिक मजबूत होत असल्याचा दावा थोरात यांनी केला.