अहिल्यानगर: मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी पारनेर पंचायत समितीचे उपअभियंता आणि दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. यापैकी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे हे पसार झाले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या फर्मला पारनेर येथील ‘मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजने’ अंतर्गत कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करणे, देयके तयार करणे आणि मंजुरीसाठी पाठवणे ही जबाबदारी उपअभियंता अजय जगदाळे, पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर मगर यांच्याकडे होती.
या कामाच्या देयक मंजुरीसाठी तिघांनी तक्रारदाराकडे ६५ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.
ACB च्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, बुधवारी सायंकाळी पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यात पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी (स्वतःसाठी व उपअभियंत्यांसाठी) यांनी तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून ६५ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ACB चे पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले की, अटक केलेले विलास चौधरी आणि दिनकर मगर या दोघांना आज, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. तसेच, पसार झालेले उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे (मूळ नियुक्ती श्रीगोंदा पंचायत समिती, पारनेरचा अतिरिक्त कार्यभार) यांच्या श्रीगोंदा येथील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली आहे.
ही कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाळासाहेब कराड, हरूण शेख यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक राजू आल्हाट अधिक तपास करत आहेत.
लाच प्रकरणी तीन बडे अधिकारी ACB च्या गळाला! दोघे पकडले एक पसार, अहिल्या नगर जिल्ह्यातील घटना
बुधवारी सायंकाळी पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला.



अहिल्यानगर: 
या कामाच्या देयक मंजुरीसाठी
ही कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे
