संगमनेर / पुणे –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप करत, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी (व्होटचोरी) करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा बनला असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाहीची हत्या व व्होटचोरी यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.
थोरात यांनी ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही भाष्य केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. लोकशाहीचा मूलभूत पाया वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे येणे आवश्यक आहे. भाजप सरकारने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि तेव्हापासून देशाची दिशा भरकटल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी देशातील काही गंभीर घटनांचा उल्लेख केला. सोनम वांगचूक यांना अटक करणे, शेतकरी आंदोलन, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचे आंदोलन, सरन्यायाधीशांवर बूट फेकणे अशा घटनांनंतरही समाज उदासीन आहे, अशी चिंता थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी थोरात यांनी सन 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या कारभाराची माहिती दिली. काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोक कल्याणकारी उपक्रम राबवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मतचोरी करून भाजप सत्तेत आला आहे. मतदानानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक असून, या सरकारला रोखण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल आहे, अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मतचोरीचे वास्तव्य लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून, मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती शिंदे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते. अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले आणि सुनील मलके यांनी आभार मानले.
धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी हा भाजपचा मुख्य अजेंडा – बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप
सोनम वांगचूक यांना अटक करणे, शेतकरी आंदोलन, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचे आंदोलन, सरन्यायाधीशांवर बूट फेकणे अशा घटनांनंतरही समाज उदासीन आहे, अशी चिंता थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.



संगमनेर / पुणे – 

थोरात यांनी ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंकांवरही भाष्य केले.
यावेळी थोरात यांनी सन 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या