
संगमनेर, प्रतिनिधी-
जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या ४ वर्षीय सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या आणि आक्रमक पाठपुराव्यातून महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात आली आहे. सकाळी जन आक्रोश आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह अवघ्या ६ तासांत पूर्ण केला.
१३ डिसेंबर २०२५ रोजी जवळेकडलग येथील सिद्धेश कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी प्रशासनाने असंवेदनशीलपणा दाखवल्याने आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

यावेळी, फक्त सहानुभूती न दाखवता कडलग कुटुंबीयांना सरकारने तातडीची मदत करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. त्यांनी तत्काळ वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून सिद्धेश कडलग यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. या आक्रमक मागणीची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी त्वरित आमदार सत्यजित तांबे यांच्या १५ डिसेंबर २०२५ च्या पत्रानुसार (जा. क्रमांक ९३४) उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत कुटुंबीयांना १० लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर केली आहे.
याचबरोबर, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर वनमंत्र्यांनी नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश दिले असून, बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांना मदत आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
सकाळी आंदोलनामध्ये आक्रमक मागणी करून तातडीने पाठपुरावा करून मदत मिळवून दिल्याबद्दल जवळेकडलग ग्रामस्थ आणि तालुक्यातील नागरिकांनी आमदार तांबे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



