
अहिल्यानगर (महाराष्ट्र संवाद न्यूज):
बनावट नाव, पत्ता आणि कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांचा मोठा गैरप्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, या चौघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, संबंधित चारही आरोपींनी २०१८ मध्ये शेवगाव शहरात वास्तव्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण भारतीय नागरिक असल्याचे भासवले आणि पासपोर्ट मिळवला. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा आढळून आला नाही.
शुओ कोनक मुस्तुडी, राजु सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनिल चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शेवगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





