अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज:
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी एका निनावी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि सखोल तपासणी केली. मात्र, सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने हा केवळ एक खोडसाळपणा आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून आता कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आणि तातडीने पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण सहा मजली इमारत रिकामी करून नागरिकांना बाहेर काढले. यानंतर सुरू झाला तो ‘सर्च ऑपरेशन’चा थरार!
बॉम्ब शोधक पथकातील ‘लुसी’ आणि ‘जंजीर’ या दोन प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या शोधमोहिमेमध्ये इमारतीचे सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग आणि संपूर्ण परिसराचा कोपरा न् कोपरा तपासण्यात आला. या मोहिमेत पोलीस दलाला अग्निशमन दल आणि एसआयडी (SID) पथकाचेही मोलाचे सहकार्य लाभले. तासनतास सुरू असलेल्या या सखोल तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत.
विशेष म्हणजे, केवळ अहिल्यानगरच नव्हे तर राज्यातील इतर अनेक ठिकाणीही अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल एकाच वेळी आल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून हा प्रकार जाणीवपूर्वक गोंधळ उडवण्यासाठी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून केला जात असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








