अकोले (प्रतिनिधी):
अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार सूचित करूनही त्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही, याचा अर्थ संगमनेर कार्यालय या बेकायदेशीर व्यवसायात सामील असल्याचे स्पष्ट होते. राजूर येथील परिस्थिती तर अधिकच बिकट झाली असून, तेथे नवीन पोलीस अधिकारी पवार रुजू झाल्यापासून दारूविक्री करणारी दुकाने आणि मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेथील पोलीस यंत्रणाच या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचा खळबळजनक आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे.
तालुक्यातील लहित, कोतूळ, ब्राम्हणवाडा, लिंगदेव, कळस, समशेरपूर, देवठाण, खिरविरे, इंदोरी फाटा, शाहूनगर, गणोरे, डोंगरगाव, धाम्बोडी फाटा, वीरगाव फाटा, वाकी आणि वारंघुशी यांसारख्या अनेक गावांमध्ये दारूचा उच्छाद सुरूच आहे. विशेष म्हणजे लिंगदेव, पिंपळगाव खांड आणि वीरगाव फाटा येथील महिलांनी एकत्र येऊन दारूचे अड्डे फोडले होते, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा तिथे खुलेआम दारू विक्री सुरू झाली आहे. ग्रामरक्षक दलाच्या निर्मितीबाबत आणि ग्रामसेवकांच्या बैठकीबाबत पाच महिन्यांपासून सूचना देऊनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
अकोले पोलीस, राजूर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग या संवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी राजूरचे अधिकारी पवार आणि संगमनेरचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांच्या निलंबनाची मागणी जिल्हा अधीक्षकांकडे केली आहे. समिती प्रमुख म्हणून तहसीलदारांनी आता कडक भूमिका घ्यावी, अन्यथा निष्क्रिय समितीमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाच्या पुढील पाऊलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







