अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरच्या राजकीय रणांगणात आज पुन्हा एकदा ‘थोरात-तांबे’ नावाचा डंका वाजला असून, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने प्रस्थापित नेतृत्वाची पकड किती मजबूत आहे, हे सिद्ध केले आहे. संगमनेरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण हा विजय केवळ एका नगरपरिषदेची सत्ता मिळवण्याचा नसून, तो संगमनेरच्या अस्मितेवर आणि विकासाच्या मॉडेलवर जनतेने दिलेली मोहोर आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांच्या रणनीतीचे अक्षरशः धिंडवडे काढत ३० पैकी २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा केवळ एक राजकीय अपघात होता, हे संगमनेरच्या मतदारांनी अवघ्या वर्षभरातच आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाचा ‘सुपडा साफ’ करून दाखवून दिले आहे. या विजयाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरल्या त्या डॉ. मैथिली तांबे! नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि आमदार खताळ यांच्या भावजय सुवर्णा खताळ यांचा १६ हजार ४०८ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. एखाद्या विधानसभा मतदारसंघात विजयासाठी जो फरक लागतो, तो फरक डॉ. मैथिली तांबे यांनी केवळ एका शहरातून मिळवून राज्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांना मिळालेली २८ हजार ३९७ मते ही विरोधकांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला आणि “४० वर्षांत काय केले?” या कुत्सित प्रश्नाला जनतेने दिलेली सणसणीत चपराक मानली जात आहे.
संगमनेरच्या आमदारपदाची संधी मिळताच खताळ यांनी माजी खासदार सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी संगमनेर मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचार केला होता. उपमुख्यमंत्र्यांना संगमनेरात आणून देखील खताळ यांना आपला विधानसभेतील करिष्मा दाखविता आला नाही.
निवडणूक प्रचारात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या विकासासाठी वर्षभरात केलेला पाठपुरावा सातत्याने संगमनेरकरासमोर आणला. तांबे-थोरातांच्या ४० वर्षांच्या सत्तेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत विकासाच्या मुद्द्यावरून रान उठवले होते. पालिकेच्या माध्यमातून काही ठराविक लोकांचा विकास झाला. मात्र, संगमनेरच्या सुज्ञ मतदारांनी या नकारात्मक प्रचाराला सपशेल नाकारले आहे. उलट, बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून आणलेले पाणी, शहराच्या पायाभूत सुविधा आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेले नाशिक-पुणे रेल्वेचे प्रश्न मतदारांना अधिक महत्त्वाचे वाटले. गेल्या वर्षभरात संगमनेरमध्ये वाढलेली गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वापर आणि बाहेरील नेत्यांचा वाढलेला हस्तक्षेप या मुद्द्यांवरून थोरात-तांबे यांनी जो संशय व्यक्त केला होता, त्यावर जनतेने मतपेटीतून शिक्कामोर्तब केले आहे.
या निवडणुकीत महायुतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देशपातळीवर सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला संगमनेरच्या गल्लीबोळात साधे खातेही उघडता आले नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३० पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारत नव्याने राजकीय नेतृत्व करू पाहणाऱ्या खताळ गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. प्रभाग ११ सह अन्य काही प्रभागातील उलथापालथ ही खताळ गटासाठी धोक्याची घंटा असून, वर्षभरातच जनतेने त्यांना जमिनीवर आणले आहे.
“गड आला पण सिंह गेला” अशी अवस्था तीन जागांवर संगमनेर सेवा समितीची झाली असली, तरी एकूण निकाल पाहता “गडही आमचा आणि सिंहही आमचाच” हे थोरात-तांबे जोडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विधानसभेच्या पराभवानंतर मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या विजयाने नवचैतन्य फुंकले असून, ‘काम केले आता कमाल करणार’ हा नारा आता प्रत्यक्षात उतरला आहे. हा नारा घेऊन आमदार तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांना काम करावे लागणार आहे. संगमनेरच्या जनतेने पोकळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला आणि विकासाच्या मॉडेलला पसंती देत संगमनेरचा ‘डॉन’ कोण, हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जगाला ओरडून सांगितले आहे.
संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांना पडलेली एकूण मते- २८३९७
महायुतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांना पडलेली एकूण मते – ११९८९
मताधिक्य – १६४०८








