संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे आज सोमवारी (२२ डिसेंबर) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हायटेक यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात बिबट्यांची घनता अधिक आहे, तिथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि ५०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वन विभागाच्या ताफ्यात २२ नवीन गस्ती वाहने आणि ५ अत्याधुनिक गन दाखल होणार असून, ही विशेष मोहीम पुढील ४ ते ६ महिने प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
अतिक्रमणे हटवण्यासाठी २२ जानेवारीची डेडलाईन- आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे गरजेचे आहे. त्यामुळे कालवे आणि वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणे २२ जानेवारीपर्यंत हटवण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून हे रस्ते वाहतुकीयोग्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि ‘रेसक्यू सेंटर’- वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांनी लोकसहभागाचे आवाहन केले. पालकांनी रोटेशन पद्धतीने ट्रॅक्टर किंवा सुरक्षित वाहनांतून मुलांना शाळेत पोहोचवावे, असे त्यांनी सुचवले. तसेच, गोरक्षनाथ गड परिसरात २०० ते २५० एकर जमिनीवर बिबट्यांसाठी ‘रेस्क्यू सेंटर’ उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली, ज्यामुळे निसर्ग संवर्धनाला चालना मिळेल.
यावेळी आमदार अमोल खताळ, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.







