श्रीरामपूर –
राजकारणात यश मिळवणे सोपे असते, पण संघर्ष आणि अपमानातून तावून सुलाखून निघत जनमाणसात स्थान निर्माण करणे कठीण असते. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने त्यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
करण ससाणे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास, त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे. अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना करण ससाणे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. राजकारणात नवखे असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला; त्यांचे वडील आणि आधारस्तंभ माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. या दुखाच्या काळात सावरत असतानाच त्यांना राजकीय अपमानालाही सामोरे जावे लागले. उपनगराध्यक्ष असूनही त्यांना हक्काचे केबिन नाकारले गेले. हा केवळ प्रशासकीय अडथळा नव्हता, तर त्यांना राजकीयदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न होता.
वडील गेल्यानंतर अनेक जुने सहकारी आणि दिग्गज शिलेदार गट सोडून गेले. ससाणेंकडे आता कुणीच उरले नाही, अशी कुचेष्टा विरोधकांनी सुरू केली होती. मात्र, डगमगून न जाता करण ससाणे यांनी माघार घेण्याऐवजी आपला लोकसंपर्क वाढवण्यावर भर दिला. निवडणुकीच्या काही महिने आधी जवळपास सर्वच मोठे चेहरे दुसऱ्या पक्षात गेले असतानाही, ससाणे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर विजयाचा पाया रचला.
इतर पक्षांनी प्रचार सुरू करण्यापूर्वीच करण ससाणे यांनी संपूर्ण श्रीरामपूर शहर तीन वेळा पालथे घातले होते. प्रत्येक वॉर्ड, गल्ली आणि सोसायटीत जाऊन त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्यांच्या या प्रामाणिक मेहनतीला श्रीरामपूरच्या जनतेने कौल दिला. ज्या ठिकाणी एकेकाळी त्यांना बसायला खुर्ची नाकारली गेली होती, आज त्याच नगरपालिकेची संपूर्ण सत्ता जनतेने ससाणे यांच्या स्वाधीन केली. दिग्गज सोडून गेले तरी निष्ठावान आणि नवख्या कार्यकर्त्यांनी दिलेली साथ या विजयात मोलाची ठरली.
विरोधकांच्या टिकेला उत्तर देत जनतेनेच आता “टायगर अभी जिंदा है” म्हणत ससाणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या यशाचे औचित्य साधून राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सतीश खताळ, राम अरगडे, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, कल्याण जोर्वेकर, प्रकाश कडलग यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








