संगमनेर | प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले असून विकासकामांच्या श्रेयावरून आता थेट ‘क्रेडिट वॉर’ सुरू झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात ज्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे, ती सर्व कामे मुळात लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेली आहेत. हा सर्व प्रकार निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, अशी घणाघाती टीका संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वागण्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद दिला जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना पुराव्यांचा पाढाच वाचला आहे. ते म्हणाले की, मालदाड येथे ज्या १७ कोटींच्या रस्त्याचे उद्घाटन झाले असे मिरवले जात आहे, त्या जाहिरातीत हा रस्ता ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’चा असल्याचे म्हटले आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’तून मंजूर झाला असून या कामाची खरी किंमत १७ कोटी नसून १९ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ६ मार्च २०२३ रोजी जेव्हा या कामाला मंजुरी मिळाली, तेव्हा अमोल खताळ आमदारही नव्हते. ज्यांना कामाची योजना आणि खरी किंमतही माहित नाही, त्यांनी श्रेयासाठी अशी ‘नौटंकी’ करणे हास्यास्पद असल्याचे फटांगरे यांनी म्हटले आहे. केवळ आकड्यांची धूळफेक करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तालुक्यातील इतर कामांचा संदर्भ देताना फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांमधील हवाच काढून घेतली. पिंपरणे येथील पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर हा रस्ता बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ८ मार्च २०२३ रोजी मंजूर झाला होता. अमोल खताळ आमदार होण्यापूर्वीच हे काम पूर्ण झाले असताना, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यावर त्याचे पुन्हा उद्घाटन कशासाठी केले जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच शेंडेवाडी ते हिवरगाव पठार हा रस्ता २१ जुलै २०२३ रोजी थोरातांच्या मागणीनुसार मंजूर झाला होता, त्यावेळीही खताळ यांच्याकडे आमदारकी नव्हती. इतकेच नाही तर ग्रामपंचायतींनी स्वतःच्या तुटपुंज्या निधीतून केलेल्या छोट्या कामांचे श्रेयही आमदार लाटत असल्याचे धक्कादायक वास्तव फटांगरे यांनी समोर आणले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सर्व ‘बनवाबनवी’ सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. वर्षभर हातात सत्ता आणि राज्याचे मंत्रिपद असताना तालुक्यासाठी कोणतेही ठोस नवीन काम उभे करता आले नाही, म्हणून आता जुन्याच कामांच्या फिती कापून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत. ज्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडले, त्यांचीही आमदार खताळ यांनी दिशाभूल केली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील फरकही ज्यांना समजत नाही, त्यांनी जनतेचे नेतृत्व करण्याची भाषा करू नये, असा टोलाही फटांगरे यांनी लगावला.
शेवटी आपली नाराजी व्यक्त करताना अजय फटांगरे म्हणाले की, आमदार महोदयांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नवीन निधी आणावा आणि विकासकामे करावीत, आमचा त्याला कधीच विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, थोरातांच्या कष्टावर आणि पाठपुराव्यावर स्वतःची पाटी लावण्याचा हा प्रकार राजकीय दिवाळखोरी दर्शवणारा आहे. संगमनेरची जनता सुज्ञ असून सत्य परिस्थिती त्यांना पूर्णपणे माहित आहे, त्यामुळे अशा निवडणुकीच्या ‘स्टंटबाजी’ला लोक बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.







