संगमनेर, प्रतिनिधी-
तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पडलेली असताना पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. या निव्वळ दुर्लक्षामुळेच १६ गावांवर तहानेची वेळ आली असून, या वाताहतीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळच पूर्णतः जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्यावर जनतेचा रोष पाहून यांना योजनेची आठवण झाली का? असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकारी सचिन दिघे यांनी उपस्थित केला आहे.
सचिन दिघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ही योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत कष्टाने मंजूर करून गेली २५ ते ३० वर्षे यशस्वीपणे सुरू ठेवली होती. अनेक अडचणी आल्या, मात्र थोरातांनी प्रत्येक वेळी मार्ग काढून १६ गावांची तहान भागवली. अगदी वीजबिलाचे प्रश्न उद्भवले तरी त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तोडगा काढला. याउलट, आताच्या नवीन आमदारांना मुळात ही योजना कशी आणि कोणत्या मार्गाने आली आहे, याचे साधे तांत्रिक ज्ञानही नाही, अशी बोचरी टीका दिघे यांनी केली.
या योजनेच्या दुरवस्थेचा पाढा वाचताना दिघे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत, तरीही सत्ताधाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कोल्हेवाडीत पालकमंत्र्यांच्याच एका कार्यकर्त्याच्या शेतात ही योजना लीक झाली आहे, मात्र तिथे दुरुस्ती करण्यासाठी विरोध केला जात आहे. आमदारांनी एकदा तरी वडगाव पान येथील तलावावर जाऊन पाहणी करण्याची तसदी घेतली आहे का? असा प्रश्न विचारत, त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘ग्राउंड झिरो’वरील अनुपस्थितीवर बोट ठेवले. ऑक्टोबर २०२४ पासून योजना बंद असताना आणि वीजबिल थकले असताना, गेल्या वर्षभरात तुमचे हात कोणी बांधले होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका करताना दिघे म्हणाले की, केवळ आमदारांनी सांगितले म्हणून पालकमंत्र्यांनी आरोप करू नयेत, तर सत्यस्थिती समजून घ्यावी. अधिकारी आज ‘आम्ही नवीन आहोत’ म्हणून हात झटकत आहेत, हे प्रशासनाचे अपयश नाही का? ज्यांनी आयुष्यभर निळवंडे धरण आणि भोजापूर चारीला विरोध केला, तेच आज ‘विकासपुरुष’ असल्याचा आव आणून स्टंटबाजी करत आहेत. मात्र, लोकांचा विश्वास तुम्ही केवळ चमकोगिरीने संपादन करू शकणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शेवटी, पालकमंत्र्यांनी कमिटी बरखास्त करण्यापेक्षा आपल्या आमदारांना जाब विचारावा, असा टोला दिघे यांनी लगावला. आमदारांनी वर्षभरात किती वेळा योजनेची पाहणी केली, वीज मंडळाशी संवाद साधला का आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचे काय केले, याचा आढावा घेतल्यास पालकमंत्र्यांना खरे दोषी कोण आहेत, हे आपोआप समजेल, अशा शब्दांत सचिन दिघे यांनी विखे-खताळ जोडीचा समाचार घेतला आहे.








