
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या राजापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेत झालेल्या या निवडीमुळे राजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तरुणांनी या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे.
राजापूर हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि मोठे बागायती क्षेत्र असलेले समृद्ध गाव आहे. या ऐतिहासिक गावात नागरी प्रश्नांची व्याप्ती मोठी असल्याने, गावातील छोटे-मोठे वाद पोलीस ठाण्यापर्यंत न जाता स्थानिक पातळीवर सामोपचाराने सुटावेत, अशी ग्रामस्थांची भावना होती. भाऊसाहेब हासे यांच्या जनसंपर्क आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊसाहेब हासे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८०% समाजकारण आणि २०% राजकारण’ या सूत्राला आपल्या कामाचा आधार मानले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत संपूर्ण गावाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
राजापूरच्या ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीत या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हासे यांच्या निवडीबद्दल संगमनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
“गावाचा विकास आणि शांतता टिकवून ठेवणे हे माझे प्रथम कर्तव्य असेल. सर्व घटकांना सोबत घेऊन गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” — भाऊसाहेब हासे (नवनियुक्त अध्यक्ष, तंटामुक्ती समिती)






