अहिल्यानगर:
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
नेमके काय आहेत निर्बंध?- या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, एकत्र जमा होणे किंवा प्रक्षोभक कृती करणे यावर बंदी असेल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
कोणाला मिळणार सवलत?
सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींना या आदेशातून वगळण्यात आले आहे:
धार्मिक विधी व कार्यक्रम: लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव आणि अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांसाठी हे नियम शिथिल असतील.
शासकीय कर्मचारी: कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या निमित्ताने यातून सूट असेल.
पूर्वपरवानगी: ज्या सभा किंवा मिरवणुका काढण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींनाही सवलत मिळेल.
प्रशासनाचा इशारा– जिल्ह्यात शांतता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.







