
संगमनेर, प्रतिनिधी-
राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही पिके उभारणीच्या अवस्थेत असून त्यांना युरिया खताची सर्वाधिक गरज आहे. परंतु, बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, जर वेळेत खत मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बाजारात खरोखरच युरियाची कमतरता आहे की काही घटकांकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, याची सखोल चौकशी सरकारने करण्याची गरज आहे. संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागांतही शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागत आहे. कृषी विभागाने आणि संबंधित मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा साखळी सुरळीत करावी, कारण शेतकऱ्यांची काळजी घेणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
केवळ युरियाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही बाळासाहेब थोरात यांनी सरकारला लक्ष केले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे मोठे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे, गेल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यांनाही अद्याप हक्काची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सध्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशा परिस्थितीत सरकारने शब्द पाळत सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील आठवण करून देताना थोरात म्हणाले की, आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आणि कोणत्याही संकटात बळीराजाला वाऱ्यावर सोडले नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला मदत करणे हे राजकारण पलीकडचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने आता विलंब न करता प्रत्येक गावात आवश्यक तेवढा युरिया साठा पोहोचवावा, जेणेकरून रब्बी हंगाम यशस्वी होईल.



