संगमनेर, प्रतिनिधी-
व्यापाऱ्यामार्फत केरळ आणि तामिळनाडू राज्यात विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता, सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परराज्यातील दोन व्यापारी पेढ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विक्रम रमेश बोचरे (रा. कुसुर, ता. जुन्नर) यांनी आपला कांदा माल केरळमधील एस. के. ट्रेडर्स आणि तामिळनाडूतील श्री मरियम ट्रेडर्स यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी मालाचे पैसे न देता त्या रक्कमेचा अपहार केला. यामध्ये एस. के. ट्रेडर्सकडून १३ लाख ७० हजार रुपये आणि श्री मरियम ट्रेडर्सकडून ५ लाख ७० हजार रुपये येणे बाकी होते.
हा व्यवहार डिसेंबर २०२४ मध्ये झाला होता, मात्र अर्जाच्या चौकशीनंतर २ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








