श्रीरामपूर –
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, इराणी गल्ली परिसरात आलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. जमावाने दगडफेक करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तसेच एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोलिसांवर वार केले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत एक राऊंड गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
तळेगाव दाभाडे (पुणे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) हा पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक मुकेश मोहरे, हवालदार अजय सरजिने, संतोष जाधव, प्रीतम सानप, प्रकाश जाधव आणि किरण मदने यांचे पथक काल दुपारी २ वाजेच्या सुमारास खासगी वाहनाने श्रीरामपुरात दाखल झाले. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, आरोपीने मागील दाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला कंपाऊंडवरून उडी मारताना पकडले.
आरोपीला ताब्यात घेत असतानाच गल्लीतील ३० ते ४० जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. आरोपी आयद सय्यद याने जमावाला उद्देशून ‘मारो इनको, ये साले पोलीसवाले कुछ नही करेंगे’ अशी भडकवणारी घोषणा दिली. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. याचवेळी १८-१९ वर्ष वयोगटातील झेरु नावाच्या तरुणाने हातात लोखंडी कोयता घेऊन ‘मारो’ म्हणत पथकाच्या दिशेने धाव घेतली. त्याने हवालदार किरण मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मदने यांनी बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या उजव्या मनगटावर गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाल्याने आणि जमावाचा हिंसाचार वाढल्याने पोलीस पथकाच्या जीविताला धोका निर्माण झाला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षक मुकेश मोहरे यांनी तातडीने स्वसंरक्षणासाठी सरकारी रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली. गोळीबाराच्या आवाजामुळे जमावाची पांगापांग झाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमी हवालदाराला उपचारासाठी हलवण्यात आले आणि आरोपीला पुन्हा बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हवालदार अजय सरजिने यांच्या फिर्यादीवरून आरोपी आयद सय्यद, झेरु आणि जमावातील ५ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांची नाराजी आणि बैठकीचे सत्र- या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. नगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बैठक घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील ड्रग्ज, अवैध धंदे आणि पोलिसांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आरोपीला पकडताना पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला; स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षक मुकेश मोहरे यांनी तातडीने स्वसंरक्षणासाठी सरकारी रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली.



श्रीरामपूर – 
आरोपीला ताब्यात घेत असतानाच गल्लीतील ३० ते ४० जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला.

