

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), संदिप गंगाधर भरीतकर (रा. भरीतकरमळा, अकोले नाका, संगमनेर), भाऊसाहेब दत्तु फरगडे (रा. निमगाव, ता. संगमनेर), संदिप विद्याधर दारोळे (रा. केळी रुंभोडी, ता. अकोले), अमोल रघुनाथ पांडे (रा. नवलेवाडी, ता. अकोले), प्रभाकर सखाराम कोटकर (रा. कुंभेफळ, ता. अकोले), आनंद देवराम सारोक्ते (रा. चिरेबंदी, ता. अकोले), सागर रमेश कानवडे (रा. निमगाव बु., ता. संगमनेर), सुधीर प्रकाश बनकर (रा. धांदरफळ, ता. संगमनेर), राजेश मल्लु गायकवाड (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर), बाबासाहेब बाबुराव चौधरी (रा. गणोरे, ता. अकोले), सुनील केशव धात्रक (रा. अशोक चौक, संगमनेर), विक्रम मधुकर नालकर (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), सुनील प्रभाकर वाडेकर (रा. वाडेकर, संगमनेर), सतीश गुलाब वाळुंज (रा. कोल्हेवाडी, संगमनेर), अफजलखान अन्सार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) आणि अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपुर, ता. अकोले)
संगमनेर तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली आहे. तालुक्यात शहर, तालुका, आश्वी आणि घारगाव अशी चार-चार पोलीस स्टेशन असूनही आणि उपअधीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी तैनात असतानाही अवैध कत्तलखाने, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, ढाबे हॉटेलवर मिळणारी बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, मटका अड्डे, जुगार अड्डे, ड्रग्स विक्री, हवाला व्यवहार राजरोसपणे सुरू आहे.
सांगवीसारख्या गावात हॉटेलमध्ये एवढा मोठा जुगाराचा बाजार भरत असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, हे आश्चर्यकारक आहे. हे दुर्लक्ष आहे की अर्थपूर्ण संगनमत, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
जेव्हा जेव्हा तालुक्यात एखादी मोठी कारवाई होते, ती नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडूनच केली जाते. एरवी जिल्ह्यात कारवाईचा बागुलबुवा करणारे अहिल्यानगर एलसीबीचे पथक, स्थानिक चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय काम करतात? असा रोखठोक प्रश्न आता विचारला जात आहे.
या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असले तरी, स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आता तरी पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस पावले उचलणार की पुन्हा ‘आशीर्वाद’ सत्र सुरूच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






संगमनेर तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली आहे.