
श्रीरामपूर –
श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली असून, जप्त केलेले सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
अहिल्यानगर उत्तर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळात नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, अकोले, संगमनेर आणि राजूर परिसरातील एकूण ५२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. यामध्ये विवो, सॅमसंग, वन प्लस, ओप्पो आणि एमआय यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या महागड्या संचांचा समावेश आहे.
या कारवाईबाबत अधिक माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, गहाळ किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी करू शकतात. आपली ओळख लपवण्यासाठी किंवा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गुन्हेगारांकडून अशा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच अशा तक्रारींवर तातडीने कारवाई करून हे मोबाईल शोधण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या पथकात श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, संतोष दरेकर, दादासाहेब लोढे, सचिन धनाड, संदीप दरंदले, रामेश्वर वेताळ, सहदेव चव्हाण आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भविष्यातही नागरिकांनी आपल्या मोबाईलची काळजी घ्यावी आणि मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





