सौ. दुर्गा सुधीर तांबे (माजी नगराध्यक्षा, संगमनेर)
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्ती अशा असतात, ज्या केवळ एका पिढीचे नेतृत्व करत नाहीत, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी विचारांचा वारसा निर्माण करतात. माझे वडील, ज्यांना आम्ही सर्वजण आदराने ‘दादा’ म्हणायचो, म्हणजेच स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे अशाच प्रगल्भ नेतृत्वांपैकी एक होते. नेते, सहकारमहर्षी, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक विविध क्षेत्रांतील अभ्यासू नेतृत्व म्हणून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
आमचा थोरात परिवार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘जोर्वे’ गावचा. जोर्वे हे केवळ एक गाव नाही, तर ती एक प्राचीन संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचा उल्लेख ताम्रपाषाणयुगीन कालखंडाशी जोडला जातो, त्या मातीत दादांचा जन्म १२ जानेवारी १९२४ रोजी झाला. आमचे पंजोबा गंगाराम पाटील आणि आजोबा संतुजी पाटील यांच्याकडून दादांना शिस्त, पारदर्शकता आणि पुरोगामी विचारांचे बाळकडू मिळाले. आजोबा त्या काळी नाशिकमध्ये मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते, त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आमच्या घरात पिढ्यानपिढ्या रुजलेले आहे.
दादांचे तरुणपण देशप्रेमाने भारलेले होते. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत पूर्णपणे झोकून दिले. अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या सोबतीने त्यांनी भूमिगत राहून काम केले. इंग्रजांना नाना प्रकारे त्रास देऊन सळो की पळो करून सोडण्याचे काम दादा आणि त्यांचे सहकारी करीत असत. इंग्रज पोलीस त्यांना शोधण्यासाठी वस्तीवर आले की, माझी पणजी पोलिसांच्या गळ्यात पडून रडायला लागायची आणि त्यांना म्हणायची, “माझ्या गळ्यातील सोन्याचा पुतळा घ्या, पण माझा सोन्यासारखा नातू मला आणून द्या.” पोलिसांना हे सर्व खरे वाटायचे आणि ते निघून जायचे. कधी दादा घरी असताना अचानक पोलीस आले, तर पणजी त्यांना नऊवारी साडी नेसवून, डोक्यावर पदर घेऊन भांडी घासायला बसवत असे. पोलीस सर्वत्र शोध घेत पण नऊवारी साडीतील व्यक्ती दादा आहेत, हे त्यांना कधीच समजले नाही.
नाशिकच्या कारागृहातील १५ महिन्यांचा कारावास हा दादांच्या वैचारिक जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा ठरला. तेथे त्यांनी रजनी पामदत्त, कार्ल मार्क्स आणि एडगर स्नो यांच्या साहित्याचा अभ्यास केला, ज्यामुळे त्यांची वैचारिक बैठक अधिक पक्की झाली. स्वातंत्र्यानंतर दादांनी महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन आयुष्यभर केवळ खादीचेच कपडे वापरले. साधी राहणी कशी असावी, हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून शिकवले.
दादांचा लढा हा केवळ खुर्चीसाठी नव्हता, तर तो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी होता. त्यांच्या दोन आंदोलनांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाचे दर कमी करावेत यासाठी दादांनी रिझर्व्ह बँकेवर ‘टिकुर मोर्चा’ काढला. हजारो शेतकरी डोक्याला टापसे बांधून आणि हातात टिकूरे (काठ्या) घेऊन मुंबईला गेले. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात बँकेच्या दारावर धडकणारा हा शेतकऱ्यांचा पहिलाच मोर्चा होता. तसेच, पूर्वी शेतीपंपाच्या वीज बिलाची आकारणी मीटरनुसार व्हायची, जी शेतकऱ्यांना न परवडणारी होती. या अन्यायाविरुद्ध दादांनी ‘मीटर हटाव’ आंदोलन छेडले. स्वतःच्या डोक्यावर विजेचे मीटर घेऊन हजारो शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईतील वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. या आंदोलनामुळेच आज महाराष्ट्रात हॉर्सपॉवर (HP) नुसार वीज बिल आकारण्याची पद्धत लागू झाली.
दादांनी ‘सहकारातून समृद्धी’ हे स्वप्न पाहिले. संगमनेर तालुक्यात त्यांनी सहकारी संस्थांचे जे जाळे विणले, ते आजही आदर्श मानले जाते. ‘राजहंस’ दूध आणि साखर कारखाना, ‘अमृतवाहिनी’ शिक्षण संस्था आणि ‘एस.एम.बी.टी.’ हॉस्पिटल ही त्यांचीच दूरदृष्टी आहे. सहकारात त्यांनी रुजवलेली आर्थिक शिस्त आणि काटकसर यामुळेच आज संगमनेरमधील पतसंस्थांमध्ये २ हजार कोटींहून अधिक ठेवी जमा आहेत. त्यांनी संगमनेर-अकोले तालुक्याच्या हक्काचे ३० टक्के पाणी मिळवून दिले आणि हा तालुका खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम केला.
वयाच्या ८२ व्या वर्षी ‘झाडे लावणारा माणूस’ हे पुस्तक वाचल्यानंतर दादांनी संगमनेर तालुक्यात १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यांनी या लोकचळवळीला ‘दंडकारण्य अभियान’ असे नाव दिले. शाहीर, गायक आणि कार्यकर्त्यांची फौज घेऊन त्यांनी डोंगरदऱ्यांत बियांचे रोपण केले. आज या अभियानांतर्गत २५ कोटींहून अधिक बियांचे रोपण झाले असून, संयुक्त राष्ट्रसंघानेही (UN) या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली आहे.
आम्ही पाचही भावंडे दादांच्या शिस्तीत आणि संस्कारात वाढलो. त्यांनी मुला-मुलीत कधीच भेद केला नाही. आम्हाला शेतात ट्रॅक्टर चालवण्यापासून ते गाईच्या धारा काढण्यापर्यंत सर्व कामे करायला लावली. साध्या राहणीवर त्यांचा कायम भर असे. दादांचे वकृत्व ओघवते होते आणि त्यांचे भाषण म्हणजे लोकांशी साधलेला संवाद असे. १४ मार्च २०१० रोजी दादांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी लावलेले विचारांचे हे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. त्यांचे पुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दादांचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे आणि संपूर्ण थोरात-तांबे परिवार दादांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत आहे.
दादांचे जीवन म्हणजे एक अखंड ‘अमृतमंथन’ होते. त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘अमृतमंथन’ आणि ‘अमृतगाथा’ या दोन पुस्तकांमधून त्यांच्या आयुष्याचा सारीपाट उलगडत जातो. आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘दादांना’ माझे विनम्र अभिवादन!
लोकनेते स्व. भाऊसाहेब थोरात – एक धगधगतं विचारपीठ
प्रस्तुत लेखाच्या लेखिका या दिवंगत नेते आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. तसेच त्या संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष देखील आहेत.


आमचा थोरात परिवार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘जोर्वे’ गावचा.
नाशिकच्या कारागृहातील १५ महिन्यांचा कारावास हा दादांच्या वैचारिक जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा ठरला.
वयाच्या ८२ व्या वर्षी ‘झाडे लावणारा माणूस’ हे पुस्तक वाचल्यानंतर दादांनी संगमनेर तालुक्यात १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला.

