संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर नगरपरिषदेने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा नवा टप्पा गाठला असून, शहरातील भूमिगत गटारी आणि ड्रेनेजच्या स्वच्छतेसाठी राज्यात प्रथमच एका अत्याधुनिक जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे. संगमनेर नगरपरिषदेचे हे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात ५ हजार लिटर क्षमतेच्या या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांच्यासह पालिकेचे विविध पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील भूमिगत सांडपाणी योजनेची देखभाल अधिक सक्षमपणे करण्यासाठी ५५ लाख रुपये खर्च करून हे यंत्र खरेदी करण्यात आले आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे यात ५ हजार लिटरची जेटिंग क्षमता आणि ३ हजार लिटर गाळ व कचरा शोषून घेण्याची क्षमता आहे. पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे ड्रेनेज लाईन चोक-अप झाल्यास ही मशीन अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे स्वच्छता करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या यंत्रामुळे आता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी ड्रेनेजमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे मानवी आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, १९९१ मध्ये डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून संगमनेर पालिकेने शहर विकासाचा आणि नागरी सुविधांचा दर्जा सातत्याने उंचावला आहे. संगमनेरची शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव ही आपली ओळख असून, ती जपत शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रक्रमी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. नवीन पदाधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहराचा लौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणात ‘संगमनेर २.०’ चा संकल्प मांडला. ते म्हणाले की, संगमनेरची राजकीय आणि सामाजिक संस्कृती पुढे नेताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देत आहोत. हे नवीन ड्रेनेज सफाई यंत्र त्याचाच एक भाग असून, येणाऱ्या काळातही नागरिकांना अशाच प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या सहकार्याने शहराला प्रगतीपथावर नेण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमजद पठाण यांनी केले. या सोहळ्याला नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, सौरभ कासार, गजेंद्र अभंग, डॉ. दानिश खान, किशोर टोकसे, सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाडे, मालती डाके, दिपाली पंचारिया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, विजया गुंजाळ, सरोजना पंडित, प्रियांका शहा, शैलेश कलत्री, नंदा गरुडकर, लाला पठाण यांच्यासह शहरातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








