संगमनेर, प्रतिनिधी –
विषय समित्या हा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा आत्मा असून, गेल्या काही काळातील त्यांची मरगळ झटकून या समित्यांना अधिक शक्तिशाली आणि लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगमनेर शहराच्या आगामी विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची एक व्यापक दिशा स्पष्ट केली.
संगमनेर नगरपालिकेच्या विशेष विषय समित्यांच्या सदस्य, सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे उपस्थित होत्या. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभावेळी आमदार तांबे बोलत होते.
तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले. बजेट आणि अधिकारांच्या मर्यादांमुळे या समित्यांकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु आता त्यांना पूर्ण ताकद देऊन शहराच्या प्रत्येक प्रश्नावर तिथे सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल, असे त्यांनी सांगितले. आरोग्य समितीच्या सभापतीपदी किशोर टोकसे यांची निवड करताना त्यांनी त्यांच्या फिरत्या स्वभावाचा दाखला दिला. तांबे म्हणाले की, टोकसे हे दिवसभर शहरात फिरत असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर आता बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
शहराच्या भौतिक विकासासाठी बांधकाम आणि पाणीपुरवठा समितीच्या कामात आमूलाग्र बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले. बांधकाम विभागाला शिस्त लावण्यासाठी किशोर पवार यांची निवड सार्थ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर पाणीपुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी वाढत्या शहराचा विचार करून नवीन आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित केली. मुजीब पठाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती येणाऱ्या काळात नवीन टाक्यांचे नियोजन आणि नवीन कनेक्शनची वाढ यावर काम करून संगमनेरकरांना अखंड पाणी देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसह त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याच्या सूचना त्यांनी सरोजिनी पगडाल आणि प्राची काशीद यांना दिल्या. शिक्षणाच्या बाबतीत तांबे यांनी एक मोठे ध्येय समोर ठेवले आहे. डॉ. अनुराधा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या मराठी आणि उर्दू शाळांचा दर्जा सुधारून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे शिक्षण कसे देता येईल, यावर भर दिला जाईल. जेणेकरून गोरगरीब सामान्य माणसाची मुलेही स्पर्धेत मागे राहणार नाहीत. तसेच नगरपालिकेच्या वाचनालयाचे अद्यावत डिजिटलायझेशन करून ते महाराष्ट्रातील एक आदर्श वाचनालय करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
शहराच्या नियोजनाबाबत बोलताना तांबे यांनी नियोजन समितीकडे शहराचा ‘डीपी प्लॅन’ तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. स्थायी समितीमध्ये ज्येष्ठ सदस्यांच्या अनुभवाची आणि तरुण सभापतींच्या उर्जेची सांगड घालून शहराचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी, सर्व नवनियुक्त सभापतींनी केवळ पदाचा मान न ठेवता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यावर अंमलबजावणी करावी, असे आवाहन करत त्यांनी पाच वर्षांच्या काळात सर्वांना कामाची संधी मिळेल असे आश्वस्त केले.
संगमनेरच्या विकासाचा नवा रोडमॅप; विषय समित्यांचे सबलीकरण करून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणार – आमदार सत्यजीत तांबे
सर्व नवनियुक्त सभापतींनी केवळ पदाचा मान न ठेवता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यावर अंमलबजावणी करावी, असे आवाहन करत त्यांनी पाच वर्षांच्या काळात सर्वांना कामाची संधी मिळेल असे आश्वस्त केले





तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले.


