संगमनेर, प्रतिनिधी –
गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १०७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी वास्तू कारखान्याच्या ‘अग्निझुंज’ या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या विधायक उपक्रमामुळे शाळेने आता कात टाकली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
राजापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील धूळ, पटांगणातील पालापाचोळा आणि जुन्या इमारतीवर साचलेली धूळ यामुळे शाळेचे सौंदर्य काहीसे झाकोळले गेले होते. ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या प्रश्नी राहुल गांधी समर्थक संघाच्या टीमशी संपर्क साधला.
यावर तात्काळ प्रतिसाद देत संघाचे समन्वयक अमोल शेलकर व राम अरगडे यांनी थोरात साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन पांडुरंग घुले, विद्यमान संचालक संतोष हासे आणि लताताई गायकर यांच्याकडे मदतीची विनंती केली.
या विनंतीचा आदर करत कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतेसाठी कारखान्याचा ‘अग्निझुंज’ हा बंब उपलब्ध करून दिला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा जोरदार मारा करून शाळेची भिंत, छप्पर आणि परिसर लिलया स्वच्छ केला. बऱ्याच वर्षांनंतर अशा पद्धतीने शाळेची स्वच्छता झाल्याचे पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राधाबाई आरोटे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी राहुल गांधी समर्थक संघ आणि कारखाना प्रशासनाचे पुष्पगुच्छ देऊन विशेष आभार मानले.
या आगळ्यावेगळ्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी राजापूर गावच्या सरपंच कुसुमताई पानसरे, ग्रामसेवक भाऊसाहेब भांड, उपक्रमशील शिक्षक वृंद, तसेच राहुल गांधी समर्थक संघाचे समन्वयक अरुण चव्हाण, अमोल शेलकर, राम अरगडे आणि इतर सक्रिय सदस्य उपस्थित होते.








