श्रीरामपूर –
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची गय केली जाणार नाही. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिर्डी पोलिसांनी हॉटेल साई सहारावर छापा टाकला होता. या कारवाईत अमोल भिमा भोसले (वय २४, रा. श्रीराम नगर, शिर्डी) आणि गणेश सिताराम कानडे (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) या दोन मुख्य आरोपींसह तीन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपी अमोल भोसले आणि गणेश कानडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच अनैतिक मानवी व्यापाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अमोल भोसलेवर यापूर्वी दोन, तर गणेश कानडेवर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. नवीन कायद्यानुसार, जर दोन किंवा अधिक व्यक्तींनी मिळून आर्थिक फायद्यासाठी वारंवार गुन्हे केले असतील, तर त्यास ‘संघटित गुन्हेगारी’ मानले जाते.
या गुन्हेगारांची ही साखळी तोडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कलम १११ वाढीव लावण्याचा प्रस्ताव दिला होता, याला वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात वाघचौरे यांनी लॉज, कॅफे मालकांना आरोपी केले होते.
कायदेतज्ज्ञांच्या मते, जर हे कलम लावले नसते, तर आरोपींना साधारणतः ८ ते १० दिवसांत जामीन मिळून ते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय झाले असते. मात्र, आता कलम १११ मुळे ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत असू शकते. या कलमाची व्याप्ती आणि तीव्रता ‘मोक्का’ कायद्यासारखीच असल्याने, आरोपींना आता किमान एक वर्ष तरी तुरुंगात राहावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.







