नाशिक –
नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले.
या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधल्याचे स्पष्ट केले. तपोवन वाचवण्यासाठी आणि त्याला वनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी संविधानिक मार्गाने जे काही प्रयत्न करावे लागतील, ते सर्व करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी या वेळी आंदोलकांना दिले.
विशेष म्हणजे, गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ही भेट झाल्याने नाशिककरांमध्ये एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या स्मृती जपण्यासाठी वनमंत्री ‘गणेश’ नाईक यांनी दिलेला हा शब्द म्हणजे नाशिककरांनी गणरायाकडे घातलेले साकडे पूर्ण होण्यासारखे असल्याचे मत काही साहित्यिकांनी व्यक्त केले आहे.
तपोवनातील सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री लवकरच प्रत्यक्ष नाशिक दौरा करणार असून, वन खात्याच्या अप्पर सचिवांना या विषयाचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती रोहन देशपांडे यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला वैशाली दळवी, गौरव दराडे, हृषीकेश गिते यांच्यासह संबंधित शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते. वनमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे तपोवन बचाव आंदोलनाला मोठी ऊर्जा मिळाली असून नाशिकच्या पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







