
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत असलेल्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सत्तेचा किती हव्यास आहे, याचं चित्र दिवसगणिक पहायला मिळत आहे. विशेषत: सत्ताधार्यांना पडलेला हव्यास इतका विकृत आहे, की कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या पक्षाकडेच एकवटली पाहिजे, असा पण या पक्षांचा दिसतो आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्या पक्षांची आहे. यात कोणाही राजकीय पक्षाची मागे राहायची तयारी नाही. जो तो सत्तेसाठी हपापलेला आहे. हे हपापलेपण पाहून मतदारही आपण यांना निवडून देऊन गैर तर केलं नाही ना, असा प्रश्न स्वत:लाच विचारू लागला आहे. विशेषत: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या हव्यासाची विकृती अधिकच डोकं वर काढू लागली आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय हे या निवडणुकांनी दाखवून दिलंय. या दयनीय राजकारणाने महाराष्ट्राची पुरती बदनामी करून टाकली आहे.
हे आजवर राज्याच्या सत्तेसाठी घडायचं. त्यात पार्टी वीथ डिफरन्स म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणारा भाजप स्वत:ला दूर ठेवायचा प्रयत्न करी. मात्र पहाटेच्या शपथेनंतर या सार्या कल्पना फोल ठरल्या. सत्तेसाठी तो पक्षही कोणताही मार्ग अवलंबू शकतो हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उघड झालं. सहकारी पक्ष करतो म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे हे काही सत्यावानाचे अवतार नाहीत. त्यांनीही साम, दाम, दंड, भेदाचा पुरेपूर वापर केला आणि विरोधी पक्षातल्या म्होरक्यांना विविध अमिषं दाखवून आणि असंख्य आश्वासनं देवून आपल्याकडे घेतलं. कार्यकर्त्यांची खेचाखेची अपुरी पडल्यावर थेट उमेदवार पळवण्याकडे कल गेला. अनेक ठिकाणी आपल्या मंत्र्यांच्या बायकांची आणि त्यांच्या सग्यासोयर्यांची बिनविरोध व्यवस्था करण्यात आली. मतदारांना पैसे वाटण्याऐवजी थेट उमेदवारच विकत घेणं सोयीचं बनलं. हे सारं निवडणूक आयोगाच्या नाकावर टिच्चून सुरू होतं. आयोगानेच हात टेकले म्हटल्यावर तक्रारीची दखल पोलिसांनी घ्यावी, अशी काही परिस्थिती राहिली नव्हती. सारं काही ठरल्याप्रमाणे पध्दतशीर सुरू होतं. नगरपालिका आणि नगरपंचायती अशा हातोहात मिळत आहेत म्हटल्यावर महानगरपालिकांमध्ये हा मार्ग अवलंबणं अडचणीचं नव्हतं.
मुंबईत सर्वाधिक जागा या सत्ताधार्यांना मिळाल्याने तिथे भाजपचा महापौर होणं हे स्पष्ट असताना पदांच्या लालसेकरिता शिंदेंनी फिरवायला घेतलेली प्यादी खूप काही सांगून जातात. आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवून आपला इरादा शिंदेंनी स्पष्ट केला आहे. तिकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही त्या पक्षाने मनसेच्या नगरसेवकांना आपल्याकडे घेत सत्तेचा दावा करायला सुरुवात केली आहे.


