मुंबई, २६ जानेवारी
छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी संगमनेरचे झुंजार युवा नेतृत्व साथी अनिकेत घुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली.
या अधिवेशनासाठी छात्र भारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले आणि राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनिकेत घुले यांची गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. विशेषतः शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी संगमनेर भागात २०२४-२५ या वर्षात विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फीची रक्कम परत मिळवून दिली.
केवळ आंदोलनेच नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा करून ‘मराठी शाळा वाचवा’ हे अभियान प्रभावीपणे राबवले होते. यासोबतच, महाविद्यालयीन तरुणांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणे ही त्यांची वेगळी ओळख मानली जाते.
गेल्या ४२ वर्षांपासून छात्र भारती संघटना महाराष्ट्रात गरिबांच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देत आहे. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर संघटनेने नेहमीच आवाज उठवला आहे. या संघटनेला डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. मु. ब. शहा, आमदार कपिल पाटील, डॉ. ना. य. डोळे आणि यदुनाथ थत्ते यांसारख्या दिग्गजांचा मोठा वैचारिक वारसा लाभला आहे.
अनिकेत घुले यांच्या निवडीमुळे आगामी काळात विद्यार्थी चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







