संगमनेर, प्रतिनिधी –
तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा जपत लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव देशपातळीवर पोहोचवणारे ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा अभूतपूर्व गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
तमाशा ही महाराष्ट्राची अस्मिता असून खेडकर यांनी या कलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. कांताबाई सातारकर यांच्यानंतर त्यांनी केवळ ही कलाच जपली नाही, तर तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्षपद भूषवून कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी यशस्वी लढाही दिला. आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावात जेव्हा पारंपारिक कला लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे, अशा काळात खेडकर यांनी विनोदी अभिनेता, सोंगाड्या आणि वगनाट्यातील प्रभावी अभिनयाच्या जोरावर तमाशा जिवंत ठेवला आहे. त्यांच्या विशेष अशा समई आणि थाळी नृत्याने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
संगमनेरची भूमी ही कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर आणि विठ्ठल उमप यांसारख्या थोर लोककलावंतांची कर्मभूमी राहिली आहे. या परंपरेत खेडकर यांना मिळालेला पद्म सन्मान हा केवळ संगमनेर शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच भावनेतून आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील सर्व नागरिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले आहे.
या विशेष गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी एक ‘राजकारण विरहित सर्वसमावेशक गौरव समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. रघुवीर खेडकर हे संगमनेरकरांचे लाडके ‘रघुभाऊ’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी स्थापन होणाऱ्या या समितीमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, जेणेकरून हा सोहळा सर्वांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरेल, असेही आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.
पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा ८ फेब्रुवारी रोजी संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार; आमदार सत्यजीत तांबे यांची घोषणा
या विशेष गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी एक 'राजकारण विरहित सर्वसमावेशक गौरव समिती' स्थापन करण्यात येणार आहे.


संगमनेर, प्रतिनिधी –
या विशेष गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी एक ‘राजकारण विरहित सर्वसमावेशक गौरव समिती’


