संगमनेर, प्रतिनिधी –
शहरातील जुना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वाहनांचा अतिवेग यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः पुणे रोडवरील मौलाना आझाद मंगल कार्यालय समोर आणि जोर्वे नाका या दोन ठिकाणी वाहने अतिशय वेगाने धावत असल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या परिसरात शाळा, रहिवासी वस्ती आणि बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक गुड्डू इंजिनिअर यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन दिले आहे. यापूर्वी अनेकदा स्थानिक स्तरावर अर्ज देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी तातडीने मानकांनुसार गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासकीय उदासीनतेवर संताप व्यक्त करत, जर पुढील १५ दिवसांच्या आत या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची कार्यवाही पूर्ण झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गुड्डू इंजिनिअर व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग या संवेदनशील प्रश्नावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण संगमनेरचे लक्ष लागले आहे.







