संगमनेर, २७ जानेवारी –
महावितरण कार्यालयात वीजबिल, नवीन वीज जोडणी आणि ट्रिपिंग यांसारख्या विविध तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक असून, यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सक्त सूचना त्यांनी महावितरणच्या आढावा बैठकीत दिल्या.
संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय कार्यालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे उपअभियंता उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यातील सौर उपकेंद्रे तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देतानाच, निमोण उपकेंद्रांतर्गत कऱ्हे येथे मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचा उल्लेख करण्यात आला. याच धर्तीवर पिंपरणे, तळेगाव, दिघे, चिंचोली गुरव, घारगाव, कोकणगाव, देवगाव आणि पोखरी हवेली या ९ गावांमध्ये मंजूर असलेली सौर केंद्रांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल आमदार खताळ यांनी नाराजी व्यक्त केली आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
तालुक्यातील वीज पुरवठ्याचे सक्षमीकरण करण्यासाठी संगमनेर आणि निमज येथील प्रस्तावित ३३/११ केव्ही उपकेंद्रांच्या कामाचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. कोकणगाव, साकूर, हिवरगाव पावसा, निमोण, धांदरफळ आणि जवळे कडलग या उपकेंद्रांची क्षमता १० मेगावॉटपर्यंत, तर कर्जुले पठार, देवगाव, पिंपरणे आणि तळेगाव येथील क्षमता ५ मेगावॉटपर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्याने मंजूर झालेली वीज रोहित्रे आणि सौर प्रकल्प यांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची गुणवत्ता तपासून ती विहित वेळेत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आले. नादुरुस्त झालेली रोहित्रे तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याला महावितरणने प्राधान्य द्यावे, असेही आमदारांनी बजावले.
ग्रामीण भागात सोलर प्रकल्प उभारताना येणाऱ्या स्थानिक अडचणी शेतकऱ्यांशी चर्चा करून सोडवल्या जातील आणि तालुक्यातील जनतेला शेती व घरगुती वापरासाठी पूर्णवेळ वीज मिळावी यासाठी आपले प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. टप्प्याटप्प्याने वीज क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. अमोल खताळ, आमदार.







