संगमनेर, प्रतिनिधी –
स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, संगमनेरमध्येही शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रशासनावर पकड असलेला उमदा नेता गमावला – बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अनेक वर्षे अजित दादा आणि आम्ही एकत्र काम केले. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि विविध खाती सक्षमपणे सांभाळण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. त्यांची वकृत्व शैली सर्वांना भावणारी होती. राजकीय कारकीर्द ऐन बहरात असताना काळाने घातलेला हा घाला अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर पकड असलेला एक लोकप्रिय आणि उमदा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.”
दमदार प्रशासक हरपला – डॉ. सुधीर तांबे
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे केंद्रस्थानी होते. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. आपल्या कामातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक दमदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे.”
जनतेच्या मनातील ‘लाडके दादा’ – डॉ. जयश्रीताई थोरात
युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजित दादा हे अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व होते. तत्परतेने काम करण्याची त्यांची पद्धत आणि स्पष्ट बोलणे यामुळे ते जनतेमध्ये ‘दादा’ या नावाने लोकप्रिय झाले. कामातील त्यांचा ‘दादा’पणा आता पुन्हा दिसणार नाही, ही महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी उणीव आहे.”
अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वच स्तरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
महाराष्ट्राने एक कणखर आणि उमदा नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यावर शोककळा, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, जयश्री थोरात यांनी व्यक्त केल्या शोकभावना
अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली

