संगमनेर, प्रतिनिधी –
सातत्याने कारवाया होऊन देखील संगमनेर मधील अवैध कत्तलखाने बंद होण्याचे लक्षण दिसत नाहीत. कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या कसायांकडून हे कत्तलखाने राजरोसपणे सातत्याच्या छाप्यानंतर देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या वाड्यावर धाडसी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३००० किलो गोमांस, ६ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १०,५७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी (२७ जानेवारी) दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे केली.
या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मदिनानगर येथील एका पत्र्याच्या वाड्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सलमान हारून मणियार (वय ३५ वर्ष, रा. मोमिनपुरा, संगमनेर) हा इसम महाराष्ट्र राज्यात गोवंश कत्तलीस मनाई असतानाही त्या ठिकाणी कत्तल करताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख रुपये किमतीचे ३००० किलो गोमांस, १ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन मोठी जनावरे व तीन वासरे, ५००० रुपये किमतीचा वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरलेली कुऱ्हाड व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्याबाबतच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ९७/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक सुजाता थोरात या करत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, अंमलदार विशाल कर्पे, आत्माराम पवार, विवेक जाधव, विजय आगलावे आणि लक्ष्मण खेडकर यांचा समावेश होता.
संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? अवैध कत्तलखान्यावर पुन्हा पोलिसांचा छापा, १०.५७ लाखांच्या मुद्देमालासह गोमांस जप्त! कत्तलखाने बंद करण्यात यंत्रणा ठरताहेत अपयशी
पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख रुपये किमतीचे ३००० किलो गोमांस, १ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन मोठी जनावरे व तीन वासरे, ५००० रुपये किमतीचा वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरलेली कुऱ्हाड व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.



संगमनेर, प्रतिनिधी –


