संगमनेर, प्रतिनिधी –
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक खंबीर पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.
आमदार खताळ म्हणाले की, या अर्थसंकल्पात बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय (AI) टूलमुळे शेतकऱ्यांना आधुनिक माहिती सहज मिळणार असून, कोकणातील नारळ बागायतदारांसाठीची विशेष योजना आणि मत्स्योद्योगातील तरतुदी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या आहेत. तरुणांच्या भविष्याचा विचार करून १५ हजार शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ आणि गेमिंग-VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल.
आरोग्य क्षेत्राबाबत त्यांनी नमूद केले की, कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती कमी झाल्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात सेमीकंडक्टर उद्योगाला दिलेली ४० हजार कोटींची चालना आणि जुन्या क्लस्टर्सचे पुनरुज्जीवन यामुळे स्थानिक स्तरावर मोठी रोजगार निर्मिती होईल.
महिला उद्योजकांसाठी ‘She-Marts’ आणि मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची सुविधा हे निर्णय सामाजिकदृष्ट्या दूरगामी ठरतील. शेती, उद्योग आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशात आघाडीवर नेईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.






