संगमनेर, प्रतिनिधी –
मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या आणि दिशाहीन सरकारचा दाखला असून, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा केवळ घोषणाबाजीला यात प्राधान्य देण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
आजच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजले गेलेले नाहीत. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही अर्थव्यवस्थेपुढील खरी संकटे असताना, लोकांचा उपभोग वाढवण्यासाठी किंवा नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणताही विचार दिसत नाही. इतकेच नव्हे तर, देशावरील वाढता कर्जबोजा आणि रुपयाची होत असलेली घसरण यांसारख्या गंभीर बाबींकडेही सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरताना थोरात यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीच्या निधीत कपात करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी कोणतीही विशेष तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. देशात आर्थिक आणि सामाजिक असमानता वाढत असताना, त्या भीषण वास्तवाचा उल्लेखही सरकारने टाळला आहे.
शेवटी, हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या आकड्यांचा खेळ असून तो जनहिताचा नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी याला ‘दिशाहीन अर्थसंकल्प’ म्हणून संबोधले. देशाला प्रगतीची नवी दिशा देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.
जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा दिशाहीन अर्थसंकल्प! – बाळासाहेब थोरात यांची मोदी सरकारवर टीका
हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या आकड्यांचा खेळ असून तो जनहिताचा नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी याला 'दिशाहीन अर्थसंकल्प' म्हणून संबोधले







