संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला असून, आगामी काळात त्याला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन परिसराचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
वेल्हाळे येथे आयोजित हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जत्रेचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी देवस्थानच्या विकासकामांचा आढावा मांडला.
ते म्हणाले की, यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या देवस्थानला अधिकृतरीत्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तालुक्यातील विविध मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि सोयीसुविधांसाठी पर्यटन विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी आणला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी खताळ यांनी विरोधकांच्या राजकारणावर सडकून टीका केली. आपण देवाच्या दारी कधीही राजकारण करत नाही, मात्र काही लोक विनाकारण विकासकामात राजकारण आणून खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. निधी आम्ही देतोय आणि श्रेय मात्र दुसरेच घेत आहेत, असे चित्र निर्माण केले जात असून जनतेने ही वस्तुस्थिती ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.
वेल्हाळे परिसरातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तो सोडवण्यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मी पूर्वीही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. जनतेची सेवा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे यातच खरा आनंद आहे. येत्या काळात कोणत्याही टीका-टिप्पणीला उत्तर न देता केवळ विकासकामांच्या जोरावर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही आमदार खताळ यांनी शेवटी स्पष्ट केले.







संगमनेर, प्रतिनिधी –