संगमनेर, प्रतिनिधी –
तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळा आणणाऱ्या आणि कामे जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरणारे काम आणि दर्जाहीन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ठेकेदारांनी कामांची मक्तेदारी निर्माण करून अनेक कामे हाती घेतली आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः नाशिक येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणारा निळवंडे–जांभुळवाडी फाटा, वडगावपान फाटा–तळेगाव–अकोले रस्ता आणि शहरातील एलआयसी इमारतीजवळील रस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महायुती सरकारच्या माध्यमातून या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असतानाही ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून ज्या ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत, त्यांचे अहवाल तयार करून त्यांच्या कामांच्या पुनर्निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी, असे सांगतानाच विकासकामांत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण खंबीरपणे पाठीशी असल्याचे आश्वासनही आमदार खताळ यांनी दिले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






